व्हिलचेअर ’ चा हुंकार



कवी मनोज बोबडे यांचा व्हीलचेअर हा ६३ कवितांचा सुंदर संच आहे. ‘वत्स-विनायक प्रकाशन’ पुणे, नागपूर द्वारा तो प्रकाशात आला आहे. प्रख्यात चित्रकार श्री अरुण मोरघडे ह्यांनी मुखपृष्ठ साकारले आहे. खगोलीय ऋतुचक्री रंगाकृतीद्वारे ‘व्हीलचेअर’च्या पार्श्वभूमीवरील गती, व्याप्ती व विशाल जीवनार्थ प्रकट करणारा भव्य चित्राविष्कार आहे. हे आविष्करण आतील काव्यात्म आशयाला पूरक ठरले आहे. सोबतच या काव्यसंग्रहातील ५७व्या ‘मी जळावानी’ या कवितेतील चार ओळी अंकित करून आयुष्यरूपी वाहत्या नदीच्या जीवनात डबक्याप्रमाणे कुठेच साचून न राहता वाहत राहून ग्रंथातीत नैसर्गिक काव्यानंद अनुभवण्याचा संदेश देण्यात आला आहे. एकंदरीत मुखपृष्ठ ही वाचक रसिकांची आतील कविता वाचण्याची जिज्ञासा तीव्रतेने जागृत करते.
मुखपृष्ठाप्रमाणे मलपृष्ठही खूप काही सांगून जाते. मलपृष्ठावरील कवी मनोज बोबडेंचे रंगीत छायाचित्र त्यांचे व्यक्तिमत्व प्रकट करते पण महत्वाचे म्हणजे महाकवी सुधाकर गायधनी व महान विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे ह्यांची व्हीलचेअर काव्यकलेबाबतची गौरवपर प्रशस्तीपत्रे आहेत. यामुळे वाचक रसिक हा कविता संग्रह वाचण्यास एकदम आतुर होतो आतील पान उघडताच माननीय आ.ह साळुंखे हयांच्या प्रस्तावनेतून आतील कावितांचे सामर्थ्य नकळत कळून येते. या पुस्तकाची बांधणी, छपाई, व मुद्रणमूल्य उच्चदर्ज्याचे आहे. या संग्रहातील कवितांचा आशय मर्मभेदी असून समाज व्यवस्थेला सुव्यवस्थित करण्याची परिवर्तनशील विधायक मानसिकता यातून प्रकट झाली आहे.
कवीराज मनोजने ६०व्या क्रमांकावर ‘व्हीलचेअर’ नावाची कविता दिली आहे. व तेच शीर्षक त्याने या कविता संग्रहाला बहाल केले आहे. तसेच अपंग असलेला हा मनोज ‘व्हीलचेअर’चा वापर करून नित्त्यानेच वाहत असतो. हेही आपण बघतोच शिवाय निर्भयतेची, निरामयतेची, निर्भ्रांततेची सुमने त्याला हातात बाळगता यावी म्हणून सुद्धा तो असा वावरतो.
इहवादी मानवीय वैज्ञानिक दृष्टीकोनातल्या विवेकरूपी धाग्यात कवीने सर्व कवितांची माळ गुंफलेली दिसते. जीवनातले सार-असार, खरे-खोटे, चुक- बरोबर, धर्म-अधर्म, जुने-नवे, सुंदर-असुंदर, श्रद्धा-अंधश्रद्धा, ज्ञान-विज्ञान, सुख-दुःख, चढ-उतार ही सर्व द्वंद्वे ओळखून योग्य ते निवडण्याचा विवेक इथे मांडण्यात आला आहे. विवेकाधिष्टीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा सत्तत्वांचा स्वीकार करण्याचे आवाहन येथील कवितांतून करण्यात आले आहे. यासाठी भगवान गौतम बुद्ध, महात्मा कबीर, संत नामदेव, महात्मा जोतिबा फुले, संत तुकाराम, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, डॉ. बाबासहेब आंबेडकर, गाडगेबाबा, या सर्व मानवतावादी विचारकांची इथे आराधना करण्यात आली आहे. या संग्रहातून कवीने आपला नेकांगी हुंकार अभिव्यक्त केला आहे. सृष्टीतल्या कणाकणातून व मनामनातून नवनवीन शिकण्याचा विचार कवीने मांडला आहे. ‘शिक्षक’ या कवितेतील पुढील ओळी बघा.
हे शिक्षक ब्रह्मांडातील, धरतीतील कणकण सारे
ते ज्ञान मिळविण्यासाठी, राहीन मी सजग सदा रे

कवीच्या विवेकी मानव्याबाबतचे काही काव्यांश नमुन्या दाखल सांगता येतील.
सुंदर हे किती| जगणे मरणे|
प्रेम देणेघेणे| अनुदिन|| (सुंदर हे किती)
           
सनातन्यांची नको झुंड ती
तुका, नामदेव, कबीर माझे.....  
अक्षर माझे शब्द राहतील
जरी वागणे फकीर माझे...(जरी वागणे)

‘प्रेम हाच देव गुरु| प्रेम भक्ती भाव
कशास तू घेतो| परलोकासाठी धाव!...’(प्रेमाचा प्रभाव)

‘विज्ञान विवेकासंगे
माणूस म्हणोनी घडलो...(ऱ्हास)

‘उदंड झाले साहस माझे, उदंड झाले बाहू
अन्यायाची सक्ती आता ती मी कशाला साहू!...(बंद करा चिवचिवाट)

अशा विधायक विज्ञानवादी वृत्तीने भारलेला हा कवी नभांगणी भरारतांना दिसतो.’जाऊ दे नभात त्या’ या सुंदर कवितेत कवी म्हणतो...
‘मी असा आहे परंतु बांधल्यापरी इथे
रोप मोकळ्या मनाचे लावू दे नभात त्या!    

कवी शेतकऱ्यालाही लढायला सांगत आहे...
...हक्क मागाया उठ, निट वागाया उठ
होय पोशिंदा खरा तू, जगाया उठ!....(दे लढा!)

देशभावना व्यक्त करताना ‘आवाहन’ कवितेत कवी म्हणतो....
‘बंधू भावना उरी धरू       
देशास ह्या उज्ज्वल करू...’

‘सगळेच मनाचे साथी’ या कवितेत कवी उद्गारतो...
‘भरभरून देऊ प्रीती
करू दुनिया मानवतेची....’

पण असे करताना ‘पडतील लाख काटे’ असा इशाराही कवी देतो. बोचणारे काटे, अडथडे येणारच पण ते ओलांडत ‘मी चालणार आहे’ असा दृढविश्वसाही कवी व्यक्त करतो.
एकंदरीत कवीने ‘व्हीलचेअर’ मधून स्वातंत्र्य-समताधिष्ठित मानवतेचा जागर करीत बहुसंख्य सर्वसामान्यांनाही जग सुंदर वं रमणीय करण्याचा कल्याणकारी विचार मांडलेला आहे. ‘कवीचा हा टाहो, घरोघरी जाओ!’
मनोजच्या काव्यप्रवासास हार्दिक शुभेच्छा!


ना. गो. थुटे
वरोरा (२०१२)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

ऐक जरा साजणे...

हे असं आहे तर...