बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

कृपा!


रामेश्वर कालच नागपूरवरून गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी त्याला कळविले होते, की ‘एका नावाजलेल्या कंपनीकडून तुला नोकरीचा 'कॉल' आला आहे.’ चार वर्षापासून ‘इंजिनियरिंगचे’ शिक्षण होऊन अंशकालीन काम करीत असलेल्या रामेश्वरला 'कॉल' आल्याचे ऐकल्यापासून आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याला आता नोकरीचे वेध लागले होते. त्याला वाटत होते ‘हा कॉल येणे म्हणजे, बाबा म्हणतात तशी आपल्या गुरुचीच कृपा असावी!’
       श्री शास्त्री महाराज हे रामेश्वरच्या कुटुंबियाचे गुरु. हे चलाख कुटूंब म्हणजे या शास्त्री महाराजांचे परम भक्त. यांच्या घरी कोणत्याही यशासाठी, भरभराटीसाठी कारणीभूत असते ती या महाराजांचीच कृपा! आताही 'कॉल' येणे ही त्या महाराजांचीच कृपा होती.
       शिववर्घन हा रामेश्वरचा जीवलग मित्र. तो या महाराजांच्या कृपेविषयी रामेश्वरला एकदा म्हणाला होता, रामेश्वर, तुमचे जेव्हा भले होते तेव्हा या महाराजांची कृपा असते, असे तू म्हणतोस, मग मागे एकदा तुमच्या शेतीच्या प्रकरणात दोन एकर शेती विकायला लागून तुझ्या भावाला बांध्याच्या झगडण्यात दोन दिवसासाठी पोलिसांनी आत केले होते. तेव्हा तू या कृपेविषयी काही बोलला नाहीस रे!
       म्हणून रामेश्वर शिववर्धनच्या पुढयात महाराजांच्या कृपेची बातच करत नाही.
तर रामेश्वर या कृपेने एकंदरच उध्दरलाच!
       उद्या मुलाखत देण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात जायचं म्हणून चेहऱ्यावरील हास्य नी मनातील आनंद यांचा संगम घडवून रामेश्वर जोमाने तयारीला लागला होता. रामेश्वर नोकरीला लागणार होता, ती कंपनी त्याच्या गावावरून २० किमी अंतरावर जिल्हयाच्या ठिकाणीच होती. एवढ्या गावानजीक नोकरी लागणं हीही महाराजांच्या कृपेची भर रामेश्वरला सुखकारक वाटल्याशिवाय राहिली नाही. याही पलीकडे पुनः त्याला कृपा हवी होती, मुलाखत यशस्वीपणे पार पडण्याची!
       सकाळी घरची मंडळी कामात दंग होती. इकडे रामेश्वरचं विश्व मुलाखतमय झालं होतं. म्हणून तो घरचा निरोप घेऊन जिल्हयाच्या दिशेने निघाला होता.
       एकदाची मुलाखत संपली. रामेश्वर कार्यालयाबाहेर निघाला तेव्हा तो निराशेने झाकाळून गेला होता. याही निराशेत त्याला मागचा प्रसंग आठवला.........मागे शिववर्धन याच कंपनीत मुलाखतीसाठी आला होता. तो एवढा हुशार, त्या क्षेत्रातील सर्व अभ्यास, बारकावे माहित असणारा, मुलाखतीमध्ये सर्व प्रश्नांची चपखल उत्तरे देणारा, बाद ठरविण्यात आला. मुलाखतकारांपैकी दोन व्यक्ती त्याच्या अतिशय जवळच्या असूनही! मग या मुलाखतीमध्ये मी त्यांच्या तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकलो नाही.
‘आता आपले काय होईल?’ या विचार तंद्रीतच तो गावाकडे आला. दोन दिवस तो घराबाहेर पडला नाही, दोन दिवस खाण्यापिण्याविषयी उपोषण धरलेलं....सगळे समजावून थक्क...........! तो दोन दिवसापर्यंत आपली ही अवस्था त्यागायला तयार नव्ह्ता....पण वडिल नारायणपंतांवर या बाबीचा कसलाच परिणाम झाला नाही. कारण त्यांनी यावरील उपचार आधीच करून ठेवला होता. रामेश्वर मुलाखतीत यशस्वी होऊ शकत नाही, याची त्यांना खात्री होती. आता त्यांना हीही खात्री होती की, उद्या रामेश्वर पूर्णपणे ताळ्यावर येईल!
तिसरा दिवस उजाडला. ‘पोस्टमन’ येऊन काहीतरी देऊन गेला. तेव्हा रामेश्वरच्या चेहऱ्यातून मोगऱ्याची फुले उन्मळून पडतांना सर्वांना दिसली....रामेश्वर आनंदातिशयाने घरभर नाचला....नाचून संपताच हे झालंच कसं? या त्याच्याच प्रश्नानं त्यालाच घेराव टाकला. तो हा विचार करून-करून पांगून गेला होता. वडिलांनी त्याची हीही अवस्था जाणून त्याला नीट समजावून सांगितलं....तेव्हा रामेश्वर म्हणाला....‘तरीच!!’
       साला, शिववर्धन नेहमी म्हणत असतो, कृपे-बिपेची गरज असते कुणाला? ज्याच्यात कर्तृत्व नसते अशांनाच ना!’’ त्याचं खरंच म्हणाव!
       कारण आपण कित्येक परीक्षा ह्या तगाद्यानच उतीर्ण झालोय...आणि श्रेय महाराजाच्या कृपेला देत आलो!

       चार-आठ-पंधरा दिवस-महिना-वर्ष उलटलं. रामेश्वर मोठ्या उत्साहाने आपली नोकरी करीत होता. खाजगी कंपनीत अभियंता होणं म्हणजे ‘लठ्ठ पगाराने घट्ट होणं’ होतं. महिन्याला पाच हजारापलीकडे हातात रक्कम न बघणाऱ्या रामेश्वरास मासिक वेतन पंचवीस ते तीस हजार मिळत होते. वेतनाच्या बाबतीत पाच-सहा पटीने तो सुजला होता. आता त्याला आकाश ठेंगणं होतं. तो भल्या थोरल्या आनंदाचा वाटेकरी झाला होता. त्याच्या जीवनाचा प्रचंड सतावणारा प्रश्न सुटला होता.
       एखाद्या शेतकऱ्याने झाडाची सारी आंबे तोडून हाटी न्यावे, अख्खा दिवस हाट करून एकही आंबा न खपावा, आणि अंती निराश होऊन परतीस निघावे, तोच अकस्मात दलालाने पुढे ठाकून दाम-दुपटीने सर्व आंबे खरेदी करावे...तेव्हा जसा आनंद त्या शेतकऱ्यास होईल! तस्सा रामेश्वराला झाला होता.
       आता रामेश्वर भविष्याची स्वप्ने रंगवू लागला. आता आपल्याला मनासारखी बायको भेटेल.’’ असा त्याचा विश्वास जागला होता. ‘धाकटी सरू आणि मी दोघेही आता एकाच मंडपात लग्न उरकू...बाबांचा आजवरचा दुसरा मोठा ताणही दूर होईल!’’
       सरूच्या लग्नाचा विषय निघाला, की चलाखांच्या घरी ताणच उफाळून येतो. दोन वर्षापासून सरुसाठी स्थळ चालून येत आहे. वीसेक स्थळे झाले असतील चलाखांनी कोणत्याच स्थळाला स्वीकृती दिली नाही.               
      आपल्या हिंदू धर्मात जसे हिंदुधर्म स्वीकारण्याच्या सर्व वाटा बंद आहेत...सोडून जाण्यास अनेक सबबी! तसेच तुम्ही चलाख जरी हिंदू असले तरी...या व्यवस्थेचा आहे तसा आदर्श थोडेच घेणार? कारण ओठातल्या नि पोटातल्या शब्दांचा मेळ चलाखांच्या घरी बसतोच कुठे? कोणत्याही रीतीने का असेना, आपले गोदाम भरण्याचे कसब तुम्हा चलाखांकडे मुबलकच आहेत रे! ‘करणी आणि कथणीला’ समयानुरूप हाताळण्याचे तंत्र तुम्ही मोठ्या चलाखीने अवगत केले आहे.’’ शिववर्धन असं स्पष्ट आणि परखड नेहमीच बोलत असतो. म्हणून रामेश्वरला शिववर्धनच्या सत्य बोलणे आणि तसेच आचरण करणे. यावागण्याविषयी नेहमीच आदर वाटत आलेला असतो. पण त्याला चलाखांचे संस्कार आणि स्वार्थ हे अजिबात सोडावेसे वाटत नाही.
       रामेश्वरनी सरूच्या या पाहणीविषयी सांगितले तेव्हा शिववर्धन असा बोलला होता.
       रामेश्वर म्हणाला,सरुसाठी वीसेक मुलं बघून गेले असतील, सगळ्यांनीच तीला पसंत केली पण पोरगा आमच्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीये. पसंत करतात पण हुंड्याशिवाय होकारच देत नाही. आम्हाला हुंडा न मागणारा मुलगा हवा आहे.’’
       शिववर्धन म्हणाला, अरे मस्त, म्हणजे तुम्ही हुंड्याच्या विरोधात? ही तर मोठ्याच आश्चर्याची, अविश्वसनीय नि आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल! व्वा! छान आहे. म्हणजे तुम्ही हुंडा देणे-घेणे या पद्धतीचा विरोध करणार? मला नवल वाटतेय यार, चलाख ही भूमिका घेत आहे म्हणजे?’’
       तू समजला नाहीस शिववर्धन, तसे नाही ते. आम्ही हुंडा देणार नाही, पण घेऊ. कारण आमच्या कडे पैसा नाहीत. रामेश्वर म्हणाला.
     शिववर्धन: वा रे चलाखांची चलाखी! स्वतःचं भरतांना थोडीशीही लाज नाही? आणि रे, किती हुंडा घेणार आहेस तू?
       “किती म्हणजे? १५ लाख रुपये घेईन, कारण माझ्या आजवरच्या संगोपणाला, आजवरच्या घरच्या बाकीच्या गरजांना, माझ्या शिक्षणाला अशा बऱ्याच बाबींना लागलाय तेवढा खर्च! रामेश्वर म्हणाला
...आणि सरुसाठी पाच पैसेही देणार नाही? या अशाच अमानवीय, अन्यायी आणि असंवेदनशील वृत्ती बाळगणाऱ्याच्या पदरीच मान, मरातब, पैसा, अडका सारे पडत असते. म्हणूनच न्यायाने, सत्याने लढणारा खस्ता खात असतो. या खस्ता खाण्यातून येणारी निराशा त्याला आपल्या मार्गावर दृढ राहू देत नाही पण सहनशीलता, धैर्य आणि विश्वास या संपत्तीच्या बळावर तो न्यालाला जागत असतो..... काय हे मी तुला सांगतोय? रामेश्वर तू एक लक्षात घे, हे सारे तुला आज जरी सुखकर वाटत असले तरी उद्या व्यक्तिश: तुझ्या मनाला समाधान देणारे नक्कीच ठरणार नाही. मला नाही आवडला तुमचा हा प्रकार. तुमची ही वृत्ती, विकृतीच वाटते मला....चल येतो मी! ....
कार्यालयात रामेश्वरनी खणखणणारा दूरध्वनी कानाला लावताच, त्याच्या चाहर्यावर नाराजीने ताबा घेतला. तो ऐकू लागला, ती सरूच्या पाहणीतून फुललेल्या प्रेमप्रकरणाची यशस्वी झालेली कहाणी होती.
पंधरा दिवसापूर्वी सरुला पाहून गेलेला मुलगा हा तीस हजार रुपये मासिक वेतन कमावणाऱ्या हुद्यावर असणारा, सरुला पसंत करून गेला. त्या आठ दिवसाच्या अवधीत चलाखांनी होकार किंवा नकार कळवू असे मुलास आश्वासन देऊनही तो कळवला नाही.....दूरवरून मुलास जेव्हा कळाले, ‘मुलगा हुंड्याची मागणी करतोय म्हणून ते मुलगी देणार नाही.’ तेव्हा मुलगा संतापला. त्याने थेट सरुला गाठले. विचारले, मी एक अनिष्ठ चालीरीतीचा विरोध करणाऱ्या मानवतावादी चळवळीचा कृतीशील कार्यकर्ता आहे. आणि माझी बाणेदारी मी प्रामाणिकपणे जपतो. चळवळीचे विचार मी मनापासून स्वीकारले आहे. म्हणूनच मी हुंडा या व्यापारजन्य रूढीचा कट्टर विरोधक आहे. करिता ‘मी बिलकुल हुंडा घेणार नाही. आणि लग्न कर्मकांडरहित नव पद्धत्तीने व्हावे!’ या दोन अटी मी पाहणीला येण्याआधीच मध्यास्थांपुढे मांडल्या होत्या. मग मी हुंडा मागितल्याचा खोटा आरोप कशासाठी करण्यात येतोय? मी पसंत नव्हतो तर प्रामाणिकपणे सांगायला हवे होते. अशा धूर्तपणाने माझा अपमान करून हे आपली कोणती चलाखी दाखवत आहेत.
मुलाचे हे सर्व भाष्य ऐकून सरुचे मन आर-पार बदलून गेले. तिनी वडिल नारायणपंत यांच्याकडून जे ऐकले होते, ते सारे चुकीचे होते. हे आता सरुला कळून चुकले. तिनी अंदाज बांधला. ‘आजपर्यंत पाहायला आलेल्या कितीतरी मुलांनी पसंती दर्शवूनही बाबांनी नुसत्या एक दोन लाखाच्या हुंड्यापायी स्थळ नाकारले. काय कारण असावे एवढी स्थळे नाकारण्या मागचे?’
सरूच्या मनात द्वंद्व सुरु झाले. तिला नारायणपंतांचे यामागील राजकारण हळूहळू उलगडत असल्याचे जाणवत होते. आपले वडिल हे तसे कट्टर परंपरावादी. त्यांना मुलगा म्हणजे वंशाचा दिवा वाटतो आणि मुलगी म्हणजे विझलेली वातही वाटत नाही. हे मी नेहमीच अनुभवत आलेले आहे. ‘आपला रामेश्वर बराच शिकलाय, याला जर नोकरी लागली तर याच्यासाठी लाखोंचा हुंडा घेऊ या!’ हे बाबांचे बोलणे मी वर्षभरापासून ऐकत आले आहे. मुलामध्ये नि मुलीमध्ये सर्वच बाबतीत फारकत ठेऊन वागणारे बाबा, मुलासाठी लाखोंचा हुंडा घेतांना माझ्यासाठी न देता लग्न केले तर समाजात नाक राहणार नाही. म्हणून मला एखाद्या गरीब मुलास देऊन माझं सौख्य धुळीस मिळविणार, माझ्या संसाराला झोपडीतला संसार करून ठेवेल. अशी शंका येत आहे.
सरूच्या मनातील या विचार द्वंद्वानी तिला एक वेगळाच निर्णय घेण्यास बाध्य केले....सरुने मुलाची कमजोरी हेरली आणि नारायणपंतांची चलाखी पण!
आता तिनी या प्रकरणास योजनाबद्ध पद्धतीने प्रेमाच्या पटरीवर न्यायचे ठरविले. तिनी मुलाच्या पुढयात एक उभा प्रश्न रोवला. तुम्ही माझ्याशी अजूनही लग्न करण्यास तयार आहे का?
अपमानास लगेच विसरणाऱ्या मुलाचे नकार देण्याचे धेर्य झाले नाही. त्याला सरू प्रचंड आवडणे हेच त्यामागे कारण होते.
सरूची योजना यशस्वी झाली आपल्यालाही बाबांसारखे धूर्त राजकारण करता येते वाटते?
गुपित माहित असलेल्या मित्रांनी मिस्किल हसत भिवया उंचावून मूक शेंरा मारावा तसा हा विचार सरूच्या मनात डोकावून गेला. तिने तो लगेच झटकला.
सरुने मुलाला सुचविले माझ्या घरच्यांकडून आपल्या लग्नास संमती मिळणे हे अशक्यपणात मोडणारे आहे. लग्न करायचे झाले तर आपल्याला नोंदणी विवाहच करावा लागेल अन्यथा पळून जाणे हाच दुसरा मार्ग होऊ शकतो. मुलगा म्हणाला माझ्या घरच्यांनाही आता इथून हे संबंध नकोय पण मला तू हवी आहेस. तर मी त्यांना याविषयी आग्रह करेन! नोंदणी विवाहाच्या निर्णयाविषयी मी दोनेक दिवसात कळवतो!
अपेक्षेची उत्कटता कशी कारगर ठरते, ती सरूच्या या वागण्यावरून कळावं!
सरुनी मुलाचा निर्णय येण्याआधीच नारायणपंतांना चिठ्ठी लिहून ठेवली......
तीर्थरूप बाबास
मी तुमच्या विरोधात जाऊन लग्न करते आहे. यासाठी बाबा मला माफ करा! मी माझ्या निर्णयात माझे सुख बघते आहे. मला अपयश तर येणार नाही, आलेच तर ती जबाबदारी पूर्णतः माझी असेल! .... विश्वास ठेवा, मी तुमचीच मुलगी आहे बाबा!
                                       
                                                  तुमचीच
                                                             सरू 
                           

       सरूचा विश्वास खरा ठरला. मुलाने होकार कळवून लग्न न्यायालयीन प्रक्रियेनुसार पार पाडले......इकडे सरुची चिठ्ठी बघून नारायणपंतांना संताप अनावर झाला. विश्वास ठेवा, मी तुमचीच मुलगी आहे बाबा चिठ्ठीतील ही शेवटची ओळ वाचताच नारायणपंतांच्या डोळ्यांनी मुलीप्रतीच्या विश्वासाचा गर्भ धारण केला. सरूच्या चिठ्ठीतील त्या वाक्याने नारायणपंताना बिनधास्त केले होते. या बिनधास्तपणात डोक्यावरील खूप मोठे ओझे उतरल्याचे नि मुलामुळे घरात श्रीमंती नांदेल याचे अपरंपार समाधान नारायणपंताच्या वाट्याला आले. मनाचा कोपरा काहीसा दुखावला असला तरी त्यापुढे त्यांच्यासाठी हा आनंद मोठा होता.

       या प्रकारामुळे आपल्या कुटुंबाची समाजात बरीच कमीपणा होईल. म्हणून रामेश्वर सरुला शिव्या देत सुटला......पण ते रामेश्वरचे दाखवायचे दात होते. सरुसाठी घरून कसलाच पैसा गेला नाही, याचे रामेश्वरला अंतरात खूप सुख वाटत होते!
       याही खेपेला रामेश्वरला शास्त्री महाराजांची कृपा आठविल्याशिवाय राहिली नाही.  

मनोज बोबडे   









सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

आत्म्याचे माहात्म्य ?

प्रकृती न्याय बजावत चालली आहे. पाल भिंतीवर किड्यांच्या शोधात फिरत आहे. आत्ताच तिने किडा पकडलाय, तो एवढा मोठा आहे, की तिला अजूनपर्यंत खाता आलेला नाही. किड्याचा जीवही अजून कायम. सगळेच जगण्यासाठी धडपडतात. ती पाल किडा खाऊन जगू पाहतेय, किडा तिच्या तोंडातून सुटून जगू पाहतोय, आणि इकडे मानसीक मरगळ झटकून लिखाणाद्वारे जगण्याचा माझा प्रयत्न चाललाय. शेवटी भिंतीवरील किडा हरला, पाल जिकली. एकाचं अस्तित्व संपून दुसऱ्यात विलीन झालं.
या पालीच्या व किड्याच्या दृष्यास् बघून माझ्या मनात आत्म्यविषयीचे काही प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न प्रत्येक विवेकी मनाला विचार करायला लावणारे आहेत. वरील दृष्यामध्ये पालीनं किड्याला गिळलं मग त्या किड्याच्या आत्म्याच काय झालं? किड्याच्या देहाप्रमाणे त्याचा आत्माही त्या पालीच्या पोटात विलीन झाला आसवा का? की स्वर्गात वा नरकात गेला? की कुठे भूत बनून भटकू लागला? मान्यतेप्रमाणे परमात्म्याला प्राप्त तर झाला नसावा? धर्मग्रंध, रुढी, मान्यता तर म्हणते, आत्मा पुनर्जन्म घेतो. की तसा काही प्रकार आहे? हे आणि असे कित्त्येक तत्सम प्रश्न आत्म्या संदर्भात संभ्रम निर्माण करतात.
      हे प्रश्न खरेतर तटस्थ असतात त्यांना पडणारे आहेत. तेच खरे धर्मविषयक बाबींमध्ये चिकित्सा करण्याची, डोळसपणे, वैज्ञानिक दृष्टीने समजून घेण्याची योग्यता राखतात. पण अशा लोकांना नास्तिक ठरविले जाते, ही गोष्ट वेगळी.
श्रद्धा, भावना यामध्ये अडकलेल्या जीवांना गुरु, बाबा, महाराज, धर्मग्रंध आणि सभोवतालची परिस्थिति हे सारे संशयात्मा विनश्यति शिकवीत असतात आणि यांना आपल्या आत्म्याचा (स्वतःचा) विनाश व्हावा असे वाटत नसल्यामुळे त्यातच गुरफटून राहण्यात धन्यता मानतात कारण पाप-पुण्यच्या धारणा यांना खुळ्या तत्वापासून ढळू देत नाही. असत्यालाच सत्य मानण्याची यांना जी शिकवण दिली जाते, तिला कित्येक सुंदर प्रेममय कर्तव्याच्या, आदराच्या, भक्तीच्या, श्रद्धेच्या गोष्टींचा मुलामा लाऊन त्या या धार्मिकांपुढे धर्ममार्तन्डान्कडून प्रस्थापित केल्या जातात आणि हे भक्त अतिशय श्रद्धेने, मोठ्या भक्तीने ग्रहण करीत असतात. हे सारं तत्वज्ञान सतत मनात, मेंदूत जात असल्यामुळे दिवसेंदिवस घट्ट होत जाते, सत्य ठरत जाते. कोणत्याही गोष्टींचा त्याच अनुषंगाने विचार करण्याची सवय झालेली असल्यामुळे पुढच्या प्रवासात तोच पगडा हक्क गाजवत असतो. असो, ही धारणा जनमाणसात घट्टपणे रुजण्याचे माझ्यापरीने हे सांगितलेले कारण आहे.
      आत्म्याविषयी पुढचा विचार करतो म्हटलं तर, कित्येक शंका डोक वर काढतात की, आत्मा हा सर्व सजीवांमध्ये असतो, सुक्ष्मातिसूक्ष्म जीवापासून तर महादेहधारी जीवांपर्यंत. मग प्रश्न पडतो, एक की अनेक? साधारणतः एक असतो, असा समज आहे. आपण मानव शरीराचाच विचार करायला गेलो तर काय पुढे येते बघू!
मानवाच्या शरीरात एक आत्मा असतो. कोणत्या अवयवात? छाती, पोट, मेंदू, हात, पाय कुठे असतो? छातीत म्हणावं तर शिरच्छेद केला तरी माणूस मरतो. मेंदूत म्हणाव तर हृदयावर आघात केला तरी माणूस मरतो. मग असे असता शरीरात कोणत्या एकाच अवयवात आत्मा असतो असे कसे म्हणायचे?
      मग तो सर्व शरीरभरच असल्याची ग्वाही द्यावी लागते. आता तोही विचार करू जाता काय हाती लागते. आत्मा सर्व शरीरभर आसतो, संवेदना जाणवते ती त्वचेमुळे आणि त्वचेच्या आतही जखम झाली तरी ती जाणवते. म्हणजे ही जी जाणीव आहे, ती आत्म्यामुळे होते. म्हणजे शरीराच्या सर्व कणाकणाला चैतन्य देणारी जी शक्ती आहे तो आत्मा. म्हणून आत्मा शरीरात एकच असतो हे सिद्ध होते(?)............. आता तो आत्मा शरीरात एकच असतो ही सिद्ध झालेली गोष्ट सुद्धा पुढील प्रश्नांनी निराधार असल्याचे कळते. मानवाचं, प्राण्याचंही रक्त लाल असते, आणि ते रक्त लाल ठेवणारे सुक्ष्म असे जीवाणू त्या रक्तात असतात. ते संख्येने करोडो, अरबो असतात. पहिले आपण पाहिले, की सर्व सूक्ष्मातीसूक्ष्म सजीवांमध्ये आत्मा असतो. मग शरीरात एकच आत्मा आहे असे असताना  शरीरातील सूक्ष्म जीवाणूच्या अरबो, खरबो आत्म्याविषयी कोणताच युक्तिवाद केला जात नाही. आणि मानवाच्या मृत्यूनंतर त्याच्या रक्तातील त्या सूक्ष्म जीवांच्या आत्म्याचं काय होत असावं? याचंही उत्तर समोर येत नाही. ते सूक्ष्मजीव महादेहधारी जीवांच्या पोषणासाठी निर्माण झालेले असतात. असं जर म्हटल्या जात असेल तर प्रत्येक जीवाचा आत्मा हा स्वतंत्र असतो असे म्हणण्यास जागा राहत नाही.
      या आणि अशा प्रश्नांनी ज्यांना गोंधळात टाकले त्यांनी एकात्मवाद हा सिद्धांत स्वीकारला असावा! त्याही सिद्धान्ताचा बारकाईने विचार केला, तरी शंका ही राहतेच. एकत्मवाद म्हणजे सर्व जीवांचा एकच आत्मा. मग एखादा जीव जन्म वा मृत्यु पावतो तेव्हा त्याचा आत्म्याशी संबंध असतो की नसतो? या प्रश्नाचे काय करायचे? सर्वांचा एकच असणाऱ्या आत्म्याशी संबध असतो म्हटलं तर अत्रूप्त आत्मे मृत्योपरांत भूत बनतात, अशी जी धारणा समाजात रूढ आहे. तिचे काय? मला आत्म्याविषयीच्या ज्या प्रश्नांनी, शंकांनी गोंधळात टाकले तेच मी इथे मांडले आहे. आज सगळीकडेच आत्म्याचे महात्म्य सांगितले जात आसताना ठोस किंवा समाधानकारक उत्तर समोर येतांना दिसत नाही. आणि जे नाहीच, ते येईल तरी कसे? हा प्रश्न आता नित्त्य माझी सोबत करीत आहे.

मनोज बोबडे

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

प्रकृतीची करणी

कार्य येथे घडते ते कारणांच्यामुळे
वाढे झाड, घेत उन्ह, पाणी पीत मुळे
संयोगाने नवल ते उदयास येते
शब्दलयासवे गोड गाणे जन्म घेते
सृष्टी हीच सर्वार्थाने सकाळाशी छान
प्रकृतीची करणी ती असते महान||


सफलता लाभते ती नियोजनातून
कधी यश धावुनी ये नेणीवेमधून
जीवनाचे सुख सारे धडपडीमध्ये
विश्वासाने कृती करा रसना ती वदे
कधि नच वास्तवाचे विसरावे भान
प्रकृतीची करणी ती असते महान||


'कोण देते?' खरे तर सवाल हा खुळा
अन्याहून संवेदेने जगतो आंधळा
रीत हीच चालताना क्रमते ही वाट
क्षमतेच्या बळावर जगण्याचा थाट
अगनीचे धूर हेच ठरे अनुमान
प्रकृतीची करणी ती असते महान||


अद्भूत घडे त्यास म्हणे चमत्कार
अंधपणामुळे दिव्य ठरे हा प्रकार
फाटला तो पडदा की उघडे झापड
उंदीरच निघे तिथे खोदता पहाड
डोळसाला प्रयोग हे प्रत्यक्ष प्रमाण
प्रकृतीची करणी ती असते महान||


मनोज बोबडे 

रविवार, ४ सप्टेंबर, २०११

विचारधन

....ही आपली खूप मोठी चुक आहे की, धर्माला आपण नैतिकतेचा समानार्थी करून बसलो, या पूर्णतः भिन्न मान्यता असूनही! धर्म हा आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक, ईश्वर, अवतार, यज्ञ, कर्मकांड, पाप-पुण्य, स्पृश्य-अस्पृश्य आदि ज्या धारणा आहेत त्यावर अवलंबून आहे. आणि नैतिकता ही सत्य आणि प्रेम यावर आधारित आहे. ज्याचे उद्दिष्ट समाजात प्रामाणिकता, कर्तव्यपरायणता, सहानुभूती, करूणा, बंधुता, सभ्यता, नागरिकता, देशप्रेम, विश्वबंधुत्व, न्याय, शिष्टाचार इत्यादींच्या मार्फत समाजात शांती, सुव्यवस्था आणि सद्भावना प्रस्थापित करून विज्ञान, कला आणि साहित्याची सेवा करत मानव जातीस सुखी, समृध्द व समाधानी करणे आहे.....नैतिकतेचे दुसरे नाव मानवता हे आहे!

(प्रयागद्त्त पंत, ‘धर्म बनाम नैतिकता’, सरिता, (११)१९७१/पृष्ठ ७३) चा मराठी अनुवाद.....


............देशाच्या भूतकाळातून वर्तमान प्रभावित झाल्याशिवाय राहूच शकत नाही, आणि वर्तमान भविष्याला प्रभावित केल्याशिवाय सोडत नाही.
      हिंदूंच्या अभिजन वर्गाची इतिहासाप्रती वेगळ्याच (अजीब) प्रकारची धारणा राहिलेली आहे. ते नेहमीच इतिहासाला आहे त्याहून निराळ्या रुपात पुढे आणत असतात. ते काळ्या भूतकाळाला चुन्याचा लेप लावून पांढरे करत असतात. आणि याला खरा, प्रामाणिक इतिहास समजल्या जावा अशी अपेक्षा करतात. त्यामागे तीच हीन भावना काम करते, जी त्यांच्यामध्ये विद्यमान असते. ती ज्या माणसात असते, त्यांच्यामध्ये विशिष्ट दोष असतात. ज्यांचा वारसा कवडीचाही अभिमान करण्या योग्य नसतो.
      आमचा इतिहास पराजयाची लंबी रांगच म्हणता येईल. जे लोक आपआपल्या देशात अकाली संकटामुळे मरायला टेकले होते, जे आपआपल्या देशातून हाकलून लावल्या गेले होते, ते येथे येऊन मोठ-मोठे साम्राज्य स्थापण करण्यात यशस्वी झाले...


(डॉ.सुरेंद्र शर्मा ‘अज्ञात’...हिंदू इतिहास:हारो की दास्तान पृ.५) चा मराठी अनुवाद.

............कपिलमुनीच्या तत्वज्ञानातील बुद्धाने ग्राह्य मानलेली तीन तत्वे:-
 अ) विचार विवेकावर आधारित असावा.
 आ) ईश्वराचे अस्तित्व आहे आणि ईश्वर या सृष्टीचा निर्माता आहे. या गृहीताला तार्किक किंवा यथार्थाचा आधार नाही.
 इ) या जगात दु:खाचे अस्तित्व आहे.
.....आणि हे बुद्धाच्या तत्वज्ञानातील खालील निवडक तत्व विचार.
.....१) विचार स्वातंत्र्य हेच सत्याचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग होय.
.....२) आत्म्यावर कोणत्याही कर्माचा प्रभाव पडत नाही.
.....३) सुद्न्य माणूस दुसऱ्यावर आश्रित होऊन कोणत्याही तत्वाचा स्वीकार करणार नाही.
.....४) काही असे म्हणतात, ‘ईश्वर उत्पत्तीचे निमित्त आहे.’ जर असे आहे तर चेतन आत्म्याच्या   प्रयासरत होण्याला काय अर्थ आहे? जो सृष्टीला गती प्रदान करतो, तोच सृष्टीची गतीही अवरुद्ध करणार!
.....५) मनुष्यप्राणी निरंतर परिवर्तनशील आहे. निरंतर संवर्धनशील आहे. आपल्या जीवनात कोणत्याही दोन क्षणी तो तोच असत नाही, असूही शकत नाही.
.....६) सर्व वस्तूंच्या अनित्य अशा प्रवृत्तीवरच इतर सर्व वस्तूंच्या अस्तित्वाची शक्यता अवलंबून आहे.
.....७) अस्तित्ववादाच्या सिद्धान्ताचा बोध सोपा आहे. सरळ आहे. कोणत्याही वस्तुन्प्रती आसक्ती बाळगू नये एवढेच!
.....८) विश्वाची नैतिक व्यवस्था कुशल असेल किंवा अकुशल असेल, परंतु ही व्यवस्था मानवाधारित आहे. अन्य कोणावरही आधारित नाही.
.....९) मानव मुक्त नसेल तर त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? पराप्राकृर्तीक कारणांवर त्याची श्रद्धा असेल तर त्याच्या बुद्धिवंत होण्याचे प्रयोजन काय?
.....१०) जे काही श्रवण करण्यास मिळाले एवढ्याच कारणास्तव ते स्वीकारू नये.--कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली एवढ्याच कारणास्तव स्वीकार्य ठरू नये.--धर्मग्रंथात एखादी बाब लिहिली आहे एवढ्याच कारणाने ती स्वीकारू नये.--एखादी बाब श्रेष्ठ आचार्यांनी किंवा संन्याशांनी कथन केली एवढ्याच कारणावरून ती स्वीकारू नये.--मान्य श्रद्धा किंवा विश्वासाच्या आधारावरच कोणतीही बाब स्वीकारू नये. आदी.


(बुद्ध आणि त्याचा धम्म: ले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर)










  प्रतीकात्मक छायाचित्र  आत्ता जरा इथून पुढे आत्ता जरा इथून पुढे झोकात चालू!  वरिष्ठांच्याही योग्य त्या धाकात चालू!  धाऊ पडू, पुन्हा उठू, रड...