हे असं आहे तर...

 सूर्य डोक्यावर चढल्याने देहछाया अस्तित्वहीन झाली होती. कोणत्याच सरळ रेषी वस्तू प्राण्यांना सावलीची सोबत उरली नव्हती. सावलीविना एकाकी असण्याचा तो क्षण होता. दुपारचे बारा वाजले होते. दुपारच्या सुरुवातीला मिलिंद कॉलेजातून येत होता. नजरेस पडला तर शिवांशीने विचारले.

"कुठे गेला होतास?"

मिलिंदनी मागे बोट दाखवून

"कॉलेजात." असे इशाऱ्यानेच सांगत
"सायंकाळी घरी ये, आपण फिरायला जाऊ." म्हणत सायकल दामटतच त्याने घराची वाट धरली. नाष्ट्यानंतर चहा घेत असतानाच मिलिंदकडे शिवांश आला.
"आई शिवांशसाठी एक कप चहा ठेव ग! बस शिवांश!" मिलिंदने खुर्ची सरकवली.
"तुझे नोकरीसाठी प्रयत्न चाललेले दिसत आहेत. ती मिळवण्याच्या प्रयत्नात इतका गर्क झालास ही कॉलेजला सुट्टी आहे हे तू विसरूनच गेला." शिवांशनी मिलिंदच्या मानसिकतेला नेमके कथन केले.
"हो हल्ली मला भान विसरायला होत आहे, यार. आज कशाची सुट्टी आहे ते कॉलेजात गेल्यावरच कळले." हे ऐकून मिलिंदने त्या कथनाला पैकीच्या पैकी गुण दिले.
    दोघेही फिरायला जाण्यासाठी निघाले. जाताना मिलिंद खाटेवर कण्हत असणाऱ्या वडिलांकडे जाऊन. 'दुपारची राख अंगाला लावली का' हे विचारताच मान हलवून बाबांनी होकार दर्शवला होता. तीन वर्षांपासून लकव्याने ग्रस्त असल्याने त्यांच्या उपचारार्थ रोज अंगाला राख लावायची असे मिलिंदच्या गुरू बाबा महाराजांनी सांगितले होते. तेच मिलिंद नियमाने पाळत होता.
मिलिंद घरातून बाहेर आला. दोघेही गेटच्या बाहेर निघून रस्त्याला लागले. बाहेर मंद गार वारा सुटला होता. रस्त्याच्या कडेने गर्द लाल पिवळ्या रंगाने डवरलेली विविध फुलांची हिरवी झाडे आपल्याच मस्तीत डुलत होती. फुलांच्या गर्दपणाचा गुरु असावा तो! त्यामुळेच त्या झाडांचे सौंदर्य अप्रतिम असे भासत होते. काही अंतर कापल्यानंतर पलीकडे विशाल वटवृक्षाखाली बाजूच्या बे घरातील आपल्याच विश्वात रममाण असंणारी मुले वडाच्या पारंब्यांवर झुला खेळत होती. काही लहानगे आपली आई कामावरून परत येताना पाहून धावत तिच्याकडे पळत होती. हे सारे अमोलिक दृश्य बघत मिलिंद व शिवांश गप्पा करीत चालले होते.
पुढे काही अंतर चालता चिंचेच्या झाडाशेजारून एक भव्य प्रेत यात्रा स्मशानाकडे जाताना त्यांनी बघितली. समस्त गावातील लोक त्या यात्रेत सामील होते. ती लांबच लांब रांग बघून कुणी मोठीच व्यक्ती असणार असा केलेला कुणाचाच अंदाज चुकला नसता.
ती यात्रा बघून शिवांश म्हणाला.
"आज कोणा श्रीमंतांच्या जाण्याने पृथ्वी हलकी झाली म्हणायची? आजच्या सुट्टीच्याच दिवशी त्यांची इथून सुट्टी झाली बघ, तीही पित्रूमोक्षाच्याच दिवशी?"
मिलिंदनी प्रचंडराव मिरासदार हे नाव सांगितले. ते शहरातील एका मोठ्या फॅक्टरीचे मालक होते. ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले होते. हे ऐकून शिवांश जरा अधिक स्पष्ट होत बोलू लागला.
"वयाच्या बरेच आधी मरण आले यांना. हार्ट अटॅक म्हटले की घातकच असते. तरीही सुटले एकदाचे. मिलिंद, तूच सांग आता अशा या पावन पवित्र दिवसावर आलेल्या त्यांच्या या मृत्यूकडे श्रद्धावान लोक कोणत्या दृष्टीने व समजीने बघतील बरं?"
    शिवांशचे कुतूहल जागे झाले. मनात काही न ठेवता मोकळेपणाने पण थेट बोलणे हाच त्याचा स्वभाव होता. मात्र हे बोलणे मिलिंदला तिरकस जाणवले. त्याचे इतकेही स्पष्ट बोलणे भावुक मिलिंदला रुचले नाही. त्याच्या या बोलण्यावर मिलिंदनी प्रश्न उभा केला.
"असं का बोलतोस आणि असली शंका कशापाई रे?"
शिवांश शांत बसणारी आसामी नव्हतीच मुळी. त्याच्या अशा बोलण्याचे प्रयोजन सांगणेच होते.
    "अंत्ययात्रेत एवढी प्रचंड गर्दी आणि तीही गर्भश्रीमंत लोकांची. यावरून वाटलं किती कोणी मोठी हस्ती असणार! आणि आहे हे तू बोललासच. गरिबांच्या मेहनतीवर त्यांचा वाजवी हक्क न देऊन आपली श्रीमंती वाढविणाऱ्या कुणाही व्यक्तीची इजारदारी वृत्ती मला नेहमीच अन्यायी वाटत आली आहे. असो, तर आपल्या सभोवताली आपण बघतोच की साध्या पपईच्या बियांच्याऐवजी एखादा वाकडा कोंब आला की लोकांना गणपती दिसू लागतो. कुठे गरम पाण्याचे झरे दिसले की तो अलौकिक चमत्कार वाटू लागतो. कुणाला चालता-फिरता मृत्यू आला की, तिथे पुण्यमरण असल्याच वाटते. मग या पितृमोक्षाच्या दिवसावर त्यांना आलेल्या मृत्यूविषयी लोक नको तो युक्तिवाद करतील यात नवल ते काय? नवल न करतील तरच! म्हणतील किती पुण्यवान माणूस! पित्रूमोक्षाच्यादिवशी मरण आले! असे प्रसंग मी बरेचदा अनुभवले आहे. मग अशी माझी शंका चुकीची कशी म्हणतोस?"

    जरा काळासाठी दोघांमध्येही शांततेने प्रवेश केला. शांततेला कंटाळा येताच मिलिंदनी आपल्या मानवीय प्रश्नांना पुढे केले.
"हो ते खर आहे. ते असो! पण श्रीमंतांच्याविषयी तुझी अशी दृष्टी का? हे कोण आहेत हे छान माहिती आहे तुला. ते प्रचंडराव मिरासदार असले म्हणून कुणी वाईट असतात का, शिवांश?"
    मानवीय तत्वांपुढे शिवांश बहुदा हार जातो. तिथे त्याचे युक्तिवाद बळकट असले तरी नम्रतेला कुठे जपावे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.
    "सगळेच काही असतात असे कुठे म्हटले मी? परंतु या श्रीमंतांच्या जमातीमध्ये पण हा मोठे स्वरूप घेऊन आडवा येतो त्याचे काय? ह्या जास्तपणाकडे बघून मी बोललो. आणि हे प्रचंडराव निघाल्यावर तर तू समजलासच की, मी काही चुकीचे बोललो नाही हे! त्यांच्याविषयी तर तुला माहीतच आहे त्यांच्या फॅक्टरीत काम करणारे कामगार यांच्या विषयी काय काय बोलायचे ते? त्यांची प्रतिमा मजदूर वर्गात हक्क देण्याप्रति डागाळलेली होती. आता एवढ्या गोळा केलेल्या संपत्तीपैकी काय घेऊन चाललेत रे ते? त्यांच्या उपरांत बरे म्हणून कोणी नाव तरी घेईल का? मला माहित आहे कुणाविषयी असं बोललेलं तुला आवडत नाही. आणि मजूर, कामगारांना नाडणारा विषय असला की बोलल्याविना मलाही राहवत नाही."
    शिवांशचे हे सगळे बोलणे मनातून सहज मान्य केले असले तरी मिलिंदनी पण आडवा आणलाच. मिलिंदला शिवांशच्या अभिजनांप्रति असणाऱ्या वेगळ्याच रागाची कायम शंका येत राहते. म्हणून शिवांशचे कितीही तर्काधिष्टीत बोलणे असले तरी तो ग्रह बाळगून मिलिंद पण चा आधार घेऊन शिवांशला बोलते ठेवतो.
    रुढीप्रिय माणसांची हीच तर मोठी अडचण आहे, मिलिंद. नव्या आणि न्यायाच्या गोष्टी त्यांना स्वीकार्य वाटतच नाही. कोणी बुजुर्ग व माननीय व्यक्तींनी बोललेलं त्याला अधिक विश्वासाचे वाटते. मग त्याविषयी शंका घेण्याच्या तसदीची त्याला गरज नसते. मग माझ्यासारख्या परिवर्तनशील विचाराच्या माणसाचं बोलणं त्याला कसं चालेल? तुझेही तसेच तर आहे. रागावू नको तुही रूढीवादी असल्याने माझ्या बोलण्याकडे गांभीर्याने बघावं असे तुलाही वाटत नाही. मग तुला भलेही ते सत्य असल्याची शंका का येईना!"
    शिवांशनी मिलिंदच्या लंगड्या प्रश्नांना निकालात काढले. आता मिलिंदला विषय बदलल्याशिवाय गत्यंतर नव्हते.
    "बरं ते जाऊ दे; पण आता प्रचंडराव गेले आहे. आता त्यांच्याविषयी आपण विपरीत कशाला बोलायचं? एक माणूस म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो व पुढच्या जन्मी त्यांना सद्गती लाभो एवढी प्रार्थना तर करू शकतो ना, की तीही नको?"
    मिलिंदनी विषय बदलला खरा पण नकळत का होईना तो खोडसाडपणा करायला विसरला नाही. शिवांशच्या विचार तत्त्वांची मिलिंदला चांगलीच ओळख असतानाही त्याने त्याला कैचीत पकडायचा प्रयत्न केलाच.
    शिवांशची रेल्वे रुळावरच होती. बटन दाबण्याचीच वेळ होती.
    "बघ रुढीप्रियतेचा दाखला दिला आहेसच ना तू. शांती, सद्बुद्धी, मारणोपरांत? कशासाठी? काय उपयोग? जे होणार नाही ते व्हावं अशी अपेक्षा करणं मला तर खुळाचारच वाटतो." शिवांशनी आपल्या मनातले स्पष्ट बोल मिलिंदच्या कानावर टाकले.
    एवढ्याने समाधान होईल तो मिलिंद कसला? न कळल्याच्या अविर्भावात तो म्हणाला.
    "म्हणजे रे?"
    "तू म्हणालास त्यांच्या आत्म्याला शांती मिळो! पुढच्या जन्मी सद्बुद्धी लाभो! पण मी ज्या आत्म्याविषयी साशंक आहे. आणि पुनर्जन्म व पूर्वजन्म याविषयी अनभिज्ञ, तेव्हा मी तशी प्रार्थना कशी काय करू शकतो? चल समज अशी प्रार्थना करावीच म्हटलं तर कोणाकोणाच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायची? त्यांच्या देहाला जगणारे कितीतरी जिवाणू, विषाणू त्यांच्या मृत्यूमुळे मृत झाले असतील, मग त्यांच्या आत्म्यास काय झालं असेल? मग कुणाकुणाच्या आत्म्याच्या शांतीची अपेक्षा करायची?"
    शिवांशचे खोल, साधारण डोक्याला जड जाईल असे तर्क जागे झाले. त्याचे ते तात्विक बोलणे मिलिंदच्या मनात कोण्या कोपऱ्यात जागा करत असले तरी त्याच्या भावनांना ते रुचत नसल्यामुळे त्याला त्याच्या प्रश्नांची ऐटबाजी कायम ठेवणे त्याला महत्वाचे वाटत होते.
    "तू एवढा हट्टी का आहेस, शिवांश? सांगितले ते मुकाट्याने केले तर तुझे काय बिघडणार आहे? कोणत्याही गोष्टी आपल्या सुयोग्य तर्काने पटवून देणाऱ्या शिवांशला कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या नसल्या तरी समाधानासाठी कराव्या लागतात एवढेही का कळू नये!"
    "पण मी हे सगळे का नाकारतो या विषयी सगळं माहीत असताना तू असा आग्रह का करतोस? हेच मला कळत नाही."
    यावर तू माझा मित्र आहेस, म्हणून. हे मिलिंदने बालिश अंगाचे उत्तर ऐकून शिवांश मनातच हसला. ते हसू चेहऱ्यावर उमटते का याचा शोध घेणाऱ्या मिलिंदला ते सापडलेच नाही.
    मग शिवांश काही वेळ विचारात पडला. काहीच न बोलता तो शांत होता ते बघून मिलिंदनी त्याला हटकले.
    "कुठे हरवलास शिवांश? तुला नाही म्हणायचे तर नको म्हणूस. पण असा अबोल नको राहुस!"
    "तुला हे असं बोजड बोजड काही सांगतो तेव्हा मी चुकतोच खरं तर... तुझ्या सोबत असताना श्रद्धा आधारित गोष्टींच्या बद्दल तुझेच ऐकायला आणि करायला हवे."
    (थोडे थांबून हसतच पुढे बोलू लागतो) "ठीक आहे तुला नाराज कशाला करावे? चल तर मग आत्मे असतीलच तर प्रचंडरावांच्या आत्म्याला तसेच त्यांच्या जीवाला आजवर जगविणाऱ्या सूक्ष्मजीव जंतूच्या आत्म्याला शांती लाभो आणि मिलिंदचे समाधान घडो!"
    मिलिंदचे मन राखण्यासाठी शिवांश असे काहीसे बोलला, तोच...
    "चला माझ्या समाधानासाठी तर माझ्या समाधनासाठी! आज एवढं बोललास उद्या जरा जास्त बोलशील!"
    मिलिंद हे बोलणं ऐकून आता जरा शिवांशचा पाराच चढला.
    "तुझ्यासारख्या धारणा असणाऱ्यांचं असंच असतं बघ. आणि हेच मला पटत नाही. कोणी प्रेमा वा आपुलकीखातर त्यांना काही करण्याची, बोलण्याची गरज पडली आणि तुमच्या मान्यता, धारणेला अनुकूल ठरली तर ती करणाऱ्याप्रति तुम्ही भलताच समज करून आपल्या धारणा दृढ करण्याचं काम करत असता, यार. मग यातील सत्य, वास्तव काय त्याचेशी काही सोयरसुतक नसते बघ अशांना. ती व्यक्ती कोणत्या प्रसंगी, कोणत्या कारणाने काय बोलतेय? याचे भान कोणत्या बधिरतेपायी विसरतात कळत नाही. तुही काही वेगळा आहेस का?"
    कोणत्या गुरूचा, बाबाचा शिष्य असेल तो याहून वेगळे काय बोलू शकतो?
    "तू कोणत्याही गोष्टीचा तेवढा किस का पाडतोस, शिवांश?"
    "बूंद बूंद से सागर बनता है मेरे यार। असल्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने चुकीच्या गोष्टी रूढ होतात. पुढ त्या मोठे स्वरूप धारण करतात. आणि परंपरा म्हणून मान्यता पावतात; म्हणून त्या वेळीच निकालात काढलेल्या समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मी या सर्व बाबी सूक्ष्मपणे अनुभवल्या आहेत. आणि अभ्यासलाही आहेत. मी या गोष्टींकडे डोळसपणे का बघतो? हे तूला कदाचित नाही माहीत. मी आज तुला सगळं नीट सांगतो बघ, हा शिवांश असा का आहे ते!"
    मिलिंदच्या मनातले सर्व भाव स्थिर झाले होते. त्याच्या कानाला सुईचाही आवाज ऐकू येईल एवढे बळ त्याने कानात जमा केले होते. रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांचा आवाज, पक्षांचा किलबिलाट, गुरांचे हंबरणे, कुत्र्याचे भुंकणे हे आता काही काही त्याला ऐकायला येत नव्हते. त्याचे कान शिवांशच्या शब्दांची आतुरतेने वाट बघत होते. ते अधीर झाले होते. आता तो आपल्या मान्यता, धारणा यांचा खून करणार की, त्यांना पोषक असे काही सांगणार? अशा शंका मिलिंदच्या मनात घारीसारख्या पंख पसरून उडत होत्या.
    शिवांश अगदीच शांत होता. तो त्याच्या पायावर चढू पाहणाऱ्या किड्याला एकटक दृष्टीने न्याहाळत असताना मिलिंदनीच तो झटकला.
    "माझ्या पणजोबांचे भाऊ मारोतराव एका साधूच्‍या नादी लागले होते. सगळ्या पारलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी साधू सांगतील ते सारे काही करत सुटले होते. रात्रीला स्मशानात अमावस्या-पौर्णिमेला मुक्काम करणे, त्या साधूच्या म्हणण्याप्रमाणे गावांमध्ये नग्न हिंडणे, अनैसर्गिक वागणे, कुणालाही भीती वाटावी असे भाव सतत चेहऱ्यावर बाळगणे अशा सर्व अघोरी प्रकारात ते रमायला लागले होते. आजोबांच्या या अशा वागण्याची चर्चा गावात बर्‍याच लोकांच्या कानावर गेली. मारोतराव आता जादूटोणा, टोटके करू लागले, याचा साक्षात्कार लोकांना झाला. त्यामुळे आमचे घर भीतीचे केंद्र बनले होते. लोक आमच्यापासून फटकून वागायचे. फक्त ज्यांना जादूटोणा, बाहेरचे, भूत, भानामती यावर उपाय हवा असायचा; तेच लोक आजोबांकडे येत.
    आजोबांनी आपले एक ठाणे बनवले होते. ज्यात भली मोठी काली मातेची मूर्ती आणि इतर गोष्टींसाठी लागणारे साहित्य जमवले होते. नदीचा घाट आणि ते देवीचे ठाणे एवढेच आजोबांचे विश्व होते. मी बालपणापासून या गोष्टी अगदी जवळून बघितल्या होत्या. त्यामुळे याबद्दल भीती कधी वाटली नाही; परंतु हे सगळे बघत मोठे होताना या सर्वांचे जवळून निरीक्षण मात्र करता आले. जसे या साऱ्यातील फोलपट लक्षात येत गेले, तसतशी यातील निरर्थकता समजत गेली. हा सगळा प्रकार धारणा, मान्यता, श्रद्धा आणि सातत्याने एकाच प्रकाराने नादी लावण्याचा आहे. तिथे कसल्या शंकांना, प्रश्नांना कसलेच स्थान नसते; पण कदाचित मी लहान असल्याने असेल आजोबा मला मोकळेपणाने सगळे सांगायचे. सोबत एक ताकीद देऊन ठेवायचे की, मी हे दुसर्‍या कुणाला सांगू नये!"
    मिलिंद आपले सगळे चित्त शिवांशच्या बोलण्यावर एकाग्र करून ऐकत होता. इतर कोणतीच गोष्ट त्याला या क्षणी व्यत्यय म्हणून नको होती. कारण पहिल्यांदाच त्याला शिवांशच्या अशा नेहमीच तर्काने बोलणाऱ्या वृत्तीचे आज नेमके कारण कळणार होते. तो ऐकत होता. फक्त ऐकत होता.
    शिवांश बोलायचं थांबला होता; पण हे बोलणं थांबणं मिलिंदला रुचलं नाही. त्यांने परत प्रश्न केला. शिवांश बोलू लागला.
    मारुतरावांची देवाधर्मावर अगाध श्रद्धा होती. ते बालपणापासून धर्म अध्यात्म मार्गातच रममान असायचे. शिवांशच्या पणजोबांनी म्हणजे नानानीच त्यांना हा मार्ग दाखवला होता.
    'जीवनाचे सार्थक करायचे असेल तर हाच मार्ग स्वीकारावा!'
    असे त्यांचे मनस्वी म्हणणे होते. तेव्हापासून त्यांनी त्याच मार्गाचा अवलंब केला होता. गुरु चरणी लिन होत ते ईश्वराधीन झाले होते; पण एकदा नानाला भुताने झपाटले त्यामुळे घरची मंडळी प्रचंड घाबरली. घरच्या सगळ्यांचाच धीर खचला. त्यांच्या त्या तशा लक्षणांमुळे घरच्या वरिष्ठ व्यक्तीसारखे ते राहिलेच नव्हते. ते आपल्याच तंद्रीत मग्न असायचे. कोणाशी बोलायचे नाही, कुणाला जवळ येऊ द्यायचे नाही. डोळे विस्फारून एकटक एकाच जागेकडे बघत बसायचे. आणि क्षणातच बडबड करत कुठेही निघून जायचे. त्यांच्या या अवस्थेला बघून ज्येष्ठ मंडळी म्हणायची.
    "याला बाहेरची बाधा झाली आहे. त्याच्या अंगात कोण्या दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे; तेव्हा तुम्ही ह्याला कुण्या वैद्यांकडे घेऊन जा! आणि त्याचे हे भूत काढून घ्या!''
    तेव्हा गावातील छु-छा करणाऱ्या एक-दोन बुवाकडे दाखवण्यात आले. त्यांनी ती बाधा काढली खरी; पण काडीचाही उपयोग झाला नाही. पुढे यासाठी कोणी मोठी हस्ती हवी असल्याचे बोलले गेले. जे मोठे अघोरी पंथीय साधू असतील त्यांच्याबद्दल माहिती घेऊन मग त्यांना त्या अघोरी बुवाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी आठएक दिवस त्यांच्यावर काय टोणे-टोटके केले माहित नाही; पण यासाठी त्या साधूंनी नानांच्या घरचे वर्षभराचे अनाजाचे कोठार रिक्त केले. नाना बरे झाले; परंतु पुढे १० दिवसातच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
    मारोतरावांचे वडील नाना गेले. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळायला तेव्हा सर्व परिवारास पंचवीस वर्षे लागली. या सर्व रहाटगाडग्यात मारोतरावांचे वैद्य होण्यामागचे कारण होते त्यांच्या वडिलांचे अघोरी साधूकडे गेल्यानंतर अगदी आठच दिवसात बरे होणे. तेव्हा मारोतरावांना फारच मोठा चमत्कार वाटला. त्यामुळे स्वाभाविकच ते त्या साधूकडे आकर्षिल्या गेले. आणि त्यांच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर वर्षभरात ते त्या अघोरी साधूकडे चेला, शिष्य बनून जाऊ लागले. त्यांनी सांगितलेल्या करवून घेतलेल्या सर्व सर्व प्रकाराचे त्यांनी तंतोतंत पालन केले होते. आणि पुढे ते या आसपासच्या बारा, चौदा गाव परिसरातले मोठे वैदु झाले होते. लोक मग त्यांच्यापासून फटकुन वागायला लागले, घाबरु लागले त्यामुळे मारोतरावांशी मानाने वागू लागले. ते भीतीमुळेच होते, हे त्यांना उमगले होते. मारोतराव नानांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे असे अघोरी बनले; पण ते मूळचे अत्यंत संवेदनशील आणि माणसात वावरणारे कौटुंबिक माणूस, त्यामुळे इतकी वर्षे ते यात वावरले खरे पण त्यांच्या मनातून संसाराप्रतीचे प्रेम कधीच वजा झाले नाही. त्यांची माणसातली आसक्ती संपली नाही; म्हणून तर ते शिवांशला या सर्व बाबी निरर्थक, बेक्कार, अगदीच फालतू आणि निरुपयोगी आहे, असे जाणवल्यामुळेच ते या गोष्टींविषयी नेहमीच समजावीत आले आहे.
    ते हे असे दुटप्पीपणे वागत होते. याला फक्त दहा वर्षे झाली होती. ही त्यांच्या स्तरावरची विवशता होती. पण विवशतेला बघून कोण्या चुकीच्या आणि घातक गोष्टीला कोणीही माफ करू शकणार नाही, हे कोण्याही संवेदनशील व्यक्तीला कळते; पण शिवांश आपल्याला नक्कीच समजू शकेल, असा विश्वास मारोतरावांच्या मनात स्पष्टपणे नांदत होता. आज नाही निदान मोठा झाल्यावर तरी शिवांश नक्कीच समजु शकेल असे त्यांना सारखे सारखे वाटत होते.
    मारोतराव या अघोरी प्रकारात रमत असल्याला 35 वर्षे होत आहेत. या दहा वर्षापासून ते लोकांना आणि स्वतःलाही फसवत जगत होते. असे हल्ली त्यांना वाटायला लागले होते. पूर्वीची पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे ते असली कामे करत आले; आणि नंतरची दहा वर्षे त्यांचे तर्कसंगत पद्धतीने जगणे, वागणे चालले होते; पण हे सगळे फक्त आणि फक्त त्यांच्या अंतरात, त्यांच्या डोक्यात होते. मारोतराव प्रत्यक्षात अनुभवलेल्या बाबींतून जन्मलेला बुद्धीवाद जोपासायला जावे तर आजवर लोकांना नादी लावून फसवल्यामुळे लोक आपली नाचक्की करतील असे त्यांना वाटत होते. हे शिवांशलाही चांगलेच ठाऊक होते.
    ते पुढील दहा वर्षापासून कार्यकारणांच्या संगतीने का वावरताहेत? याचे कारणही त्यांचेच वडील होते. म्हणजे परत त्यांच्या वडिलांचे ते भूतच होते. खरे तर ते भूत हे दुसरे तिसरे काहीही नसून एका जिवंत व्यक्तीचे पछाडणे होते.
    ती व्यक्ती होती, एक सुंदर, राजस, लोभस कोणात्याही हृदयधारी मनुष्यास आपल्या सौंदर्यसौष्ठवाने, वेड लावणारी चित्तहारी रुपवती. मारोतरावांचे वडील नाना म्हणजे गावातील सन्माननीय हस्ती. त्यांना आपल्या मानाचा विलक्षण मान होता. पण इथे निसर्गाची किमया वरचढ ठरली होती, असेच म्हणावे लागेल! पुरत्या अनावर झालेल्या भावना, मोह, आसकी, प्रेम आदींनी जखडून नाना त्या सुंदर ललनेच्या मोह पाशात पूर्णतः गुंतत गेले.
    दिवस जात राहिले, जात राहिले. वर्षेही उलटत गेली. ते त्या स्त्रीच्या सर्वस्वी अधीन झाले. घराकडे पूर्णपणे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागल्याने घरची पुरती हेळसांड होत होती. त्यामुळे मारोतरावांच्या आईची रोजची चिडचिड वाढली होती. तिच्याच अंगावर सगळा घरचा भार आल्याने तिची निराशा वाढत चालली होती. नाना सतत गुपचूप राहायचे. त्या स्त्रीने वडिलांवर खूप मोठे गारुड टाकले होते. ती नानांची भावनिक पातळीवर हवी तशी लूट करू लागली. नानांना त्यांचे प्रेम प्रकरण घरच्यांना सांगण्याची धमकी देऊ लागली. अशीच हळूहळू आपल्या गरजा पूर्ण करता करता तिच्या अपेक्षा भारंभार वाढू लागल्या होत्या. त्यामुळे तिने हळव्या मनाचा आधार धरत, नानांना या ना त्या कोंडीत पकडत त्यांचे आर्थिक दोहन करत चालली होती. या गोष्टीचा नानांच्या मनावर फार खोल परिणाम झाला होता. हा धक्का ते पेलू शकले नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक विश्वच उध्वस्त झालं होतं. डोक्यावर आकाश कोसळलं की, होणाऱ्या अवस्थेसारखी त्यांची दशा झाली होती. त्यांच्या मनातील विचारांची गती ताशी दशलक्ष किमी. झाल्याने एका विचाराचे दुसऱ्याशी तार जुळत नव्हते. वाऱ्याच्या घोंगावणार्‍या आवाजाप्रमाणे असणाऱ्या मनातील विचारांनी मेंदूला पार निष्क्रिय करून टाकले होते. परिणामी नानांची मानसिकता या जगापासून, संसारा, कुटुंबा, मित्रा, नातलगापासून तूटण्यात झाली. आणि मग पुढचे प्रकरण घडत गेले.
    ती स्त्री कुणा श्रीमंतासोबत पळून गेल्याची बातमी साधूंकडे असताना नानांच्या कानावर आली. ती ऐकून नानांच्या आनंदाने अशी उसळी घेतली की तेथील कोणाच्याच नजरेपासून तिला लपता आले नाही. त्या उत्कर्षाचा परिणाम असा झाला की, नाना चारच दिवसात बरे झाले; पण काही दिवसातच त्यांना कळले होते की, तोवर गावात त्यांची प्रचंड नाचक्की झाली. आणि हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले होते.
    कुटुंबातील हा सगळा इतिहास शिवांशनी नीट कथन करत असताना मिलिंद हे सारे त्याच्या मनाच्या, कानाच्या, डोक्याच्या एकाग्रतेने ऐकत होता. आता मिलिंदकडे शिवांशसाठी कसलेच प्रश्न शिल्लक राहिले नव्हते. त्याच्या सर्व शंकांचा विलय झाला होता. तो आता काही बोलणार नव्हता. त्याला आता फक्त शिवांशला ऐकत राहायचे होते.
    शिवांश बोलतच होता. "हे बघ मिलिंद, या क्षेत्रातले हे प्रकार मी अगदी आणि अगदी जवळून बघितले, प्रत्यक्ष अनुभवलेल्या कृती केलेले त्यातल्या बऱ्याच बारीकसारीक बाबी जाणणाऱ्या माझ्या आजोबांकडून मी सतत ऐकत आलो त्यामुळेच सजग होत आलो. या सार्‍या गोष्टींचे बारकाईने आकलन करत आलो. त्यामुळे याबाबत मी माझ्या कुवतीप्रमाणे खात्रीशीरपणे बोलू शकत आहे. त्यामुळेच मी आज तुला हे सगळं छातीठोकपणे सांगू शकतो आहे. मिलिंद."
    असा सगळा सविस्तरसा भूतकाळ सांगून शिवांश थांबला. आणि आपल्या जागेवरून उठून मिलिंदच्या समोर हेलपाटे मारु लागला. तरी मिलिंदला भानावर यायला बराच वेळ लागला. कारण तो शिवांशचे तर्कसंगत विचार ऐकण्यात, त्याचा बुद्धीवादी भूतकाळ समजून घेण्यात तो इतका निमग्न झाला होता की, त्याला वाटत होते शिवांशचे असे हे तर्कसंगत, विवेकी बोलणे कधीच संपू नये. पण ते कधी ना कधी संपणार होतेच.
    आता दोघांच्यात स्मशान शांतता पसरली होती. घटकाभर कुणीच काही बोलायला तयार नव्हते. तेवढ्यात एक मुलगा धापा टाकत शिवांश आणि मिलिंदच्या पुढे येऊन उभा ठाकला. तो हापत हापत मिलिंदपुढे काहीतरी बोलू लागला. तेव्हा मिलिंदच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मिलिंदचे सगळे त्राण संपले. त्याचे पाय लुळे पडले. त्याची निराधार वेलीसारखी अवस्था झाली होती. तो मटकन खालीच बसला. शिवांशनी मिलिंदला आधार देत सांभाळले. त्याचे डोके आपल्या छातीवर घेऊन खांद्यावर हात धरून घरी आणले.
    घरचे वातावरण शोकमग्न होते. शेजारील लोक गोळा झाले होते. बाबांच्या बरं होण्यासाठी आपण जे काही उपाय करायला हवे होते. ते न करता बुवा, बाबा, महाराज वैद्य यांच्याकडे जात राहीलो. हे सारे न करता डॉक्टरांकडे उपचार सुरु ठेवले असते तर कदाचित बाबा हयात असते. हा विचार मिलिंदच्या मनाच्या आत सारखा टोचत होता....

-मनोज बोबडे

शस्त्रक्रिया

अलीकडेच पाऊस पडून गेला होता. सारे रस्ते सारवल्यासारखे स्वच्छ, चकाकदार नी निर्मळ झाले होते. आसमंत सावळा होऊन हसत होता. नुकत्याच बाथरूममधून न्हाऊन बाहेर निघालेल्या स्त्रीच्या केसातुन पाणी निथळावे तसे झाडांच्या पानापानातून थेंब सांडत होते. अशा वातावरणात चकाकणार्‍या डांबरी रस्त्यावर एक मुलगा त्याच्या मैत्रीणीस निरोप देऊन डोळे पुसत जात होता.

हे दृश्य प्राजक्ता शेजारीच असलेल्या बंगलेवजा घराच्या खिडकीतून निशानेबाजाच्या नजरेने बघत होती. एकटक, स्थिर! तिच्या मनात चालत असलेलं द्वंद्व तिला त्या दृष्यातून प्रतीत होत होतं. तिचे विचार विश्व नकारात्मक भावनेने भरलेले होते. यामुळेच त्या दृश्याने तिच्या चेहऱ्यावर कमालीचे औदासीन्य पसरवले होते. चेहरा मलूल बनला होता. ही तिची अवस्था शेजारीच बसलेली सई बारकाईने न्याहाळत होती.

भिवया उंचावून सईने नजर फिरवली. ती पडली सरळ भिंतीवरील फोटोवर. जी प्राजक्ताचीच पेंटिंग होती. गर्द फुलांच्या कुंडी शेजारी व्हीलचेअरवर बसलेल्या प्राजक्ताची ऑइल पेंटिंग होती ती.

"वाव! किती मस्त चित्र आहे ग तुझं! कोणी काढलं? तो रेखाटलेला चेहऱ्यावरील जिवंतपणा, ती रंगसंगती, ती ब्रशची कलाकारी. क्या बात है!"

हे सारे ऐकून न ऐकल्याच्याच अविर्भावात प्राजक्ता होती.

"प्राजक्ताssss?" सई जवळजवळ ओरडलीच. तोच आवाज प्राजक्ताला बोलविता ठरला.

"हो छानच आहे, विप्लवनी काढले आहे."

"मी सांगते हा खूप मोठा आर्टिस्ट होणार, बघच तू!"

"हो तो गुण आहे त्याच्यात, मला माहिती आहे. आणि तसे इतरही बरेच गुण आहेत."

प्राजक्ताच्या चेहऱ्याची उदासी हेरलेल्या सईला तिचे हे बोलणे ऐकून 'कुछ तो गडबड है।' याची तिला खात्री झाली होती. म्हणून सई प्राजक्ता जवळ येऊन तिचा हात हाती घेत नम्रपणे विचारु लागली.

"काय झालं प्राजक्ता? विनम्रची प्रतिभा मला माहीत नसली तरी त्याचे आणि तुझे एकमेकावर खूप प्रेम आहे, हे मला चांगलेच ठाऊक आहे. याबद्दल तू तासनतास माझ्याशी बोलली आहेस. आजवर खूप प्रेमळ, समजदार, मोकळ्या मनाचा, प्राकृतिक स्वभावाचा अशा बिरुदांनी विप्लवचे गुण गाणारी प्राजक्ता अचानक अशी उपरोधिक का बरं बोलू लागली?"

सईला अनामिक भीती वाटत होती. प्राजक्ता आणि विप्लव एकाच अवस्थेचे. दोघेही विकलांग होते. या त्यांच्या समदुःखीपणापाईच ते दोघे परस्परांच्या जवळ आले होते. खूप भरभरून प्रेम करू लागले होते. विप्लवचा प्राजक्तावर खूप जास्त जीव होता. आणि प्राजक्ताचेही त्याच्यावर अपार प्रेम होते; पण या क्षणी प्राजक्ता फारच कष्टी दिसत होती. आताचे तिचे तुसडेपणाने बोलणे सईला विचार करायला लावत होते.

म्हणून सईचे तिला प्रश्न विचारणे सुरु होते. प्राजक्ताने ठरवले होते ती कोणत्याही परिस्थितीत, कधीच जीवनाच्या अंतापर्यंत विप्लवशी नाते तोडणार नव्हती. त्याच्यापासून कधीच प्राजक्ता दूर होणार नव्हती. तिनी यावर सईशी बरेचदा चर्चा देखील केलेली होती; पण आता तिला हे प्रेम जीवनभर चालेल की नाही याची शंका येऊ लागली.
का? का याबाबत सईला काही की काहीच थांगपत्ता नव्हता. परवाच दुबईवरून आलेली सई न कळवता भेटायला येऊनही प्राजक्ताला याचे कसलेच आश्चर्य नव्हते. याचे कारण होते. या चारच दिवसांपूर्वी पहाटे पहाटे तिला पडलेले स्वप्न. तेव्हापासून प्राजक्ताचे मन विचलित झाले होते. तिच्या मनाच्या गोंधळाने तिला पुरते विचलित करून सोडले होते.

प्राजक्ताला असे स्वप्न का पडले? याआधी काय चालले होते तिच्या डोक्यात? खरेतर या महिन्याभरापासून चाललेल्या यांच्या शास्त्रक्रियेबद्दलच्या निर्णयाचाच हा परिणाम होता. विज्ञानाने आश्चर्यकारकरित्या प्रगती केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कारिक शस्त्रक्रियेने हे दोघेही चालायला लागतील अशी शेकडा नव्यान्नव टक्के डॉक्टरांकडून दोघांनाही ग्वाही मिळाली होती. त्यामुळेच या उभय जीवांनी उपचार करायचा असे ठरविले होते. सर्व प्रकारची माहिती घेऊन हे सर्व सोपस्कर करायचे असे आठ दिवसापूर्वीच ठरविण्यात आले. हल्ली यांचे मध्ये मध्ये डॉक्टरांकडे जाणे होते, ते याच कारणाने. तेव्हापासून आजवर त्यांच्या सगळ्या तपासण्या पूर्ण झाल्या होत्या. आता पुढील शनिवारी प्राजक्ताची आणि विप्लवचीही शस्त्रक्रिया होणार आहे. विप्लवची शस्त्रक्रिया मुंबईमधील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत होणार आहे आणि प्राजक्ताची नागपुरातील विशेष प्रवीण डॉक्टर शस्त्रक्रिया करणार असे यांना सांगण्यात आले.

विप्लवनी सर्व तयारीनिशी चार दिवसांपूर्वीच मुंबई गाठली. आणि प्राजक्ता दोन दिवसांनी नागपूरला जाणार आहे; परंतु आत्ताच प्राजक्ताच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तिच्या कालच्या स्वप्नाने तिचे संपूर्ण होश उडवले. विप्लवचे ते तार्किक वागणे, बोलणे आणि शेजारील काकांचे जे प्राजक्ताचे ज्येष्ठ मित्र आहेत. त्यांनी वर्तवलेले विप्लवविषयीचे भविष्य या साऱ्याकडे बघता प्राजक्ता पुरती हताश झाली होती. या 24 तासांच्या काळातील एकाही क्षणाने तिच्या मना, मेंदूचा पिच्छा सोडला नव्हता.

प्राजक्ताच्या स्वप्नामुळे, त्या मित्र काकांनी वर्तविलेल्या भविष्यामुळे घेतलेल्या धास्तीने प्राजक्ता बरीच विचलित झालेली बघून सईही विचारात पडली. तिला यावर काय बोलावे कळत नव्हते. तरी या क्षणी शांत राहून चालणार नव्हते. सईनी प्राजक्ताला समजाविण्याचा असफल प्रयत्न केला.

"मला वाटते तू हे पाण्यातून दिसणाऱ्या काठीला बघावे तसे बघते आहेस. जी सरळ कधीच दिसत नाही. याचा अर्थ ती वाकडीच असते, असे नाही! काही घडण्याआधी कयास करणे बरे नसते, प्राजु. प्रकृती बिघडवत असते ते. सोड हे सगळं. सत्य ते स्वीकारण्याचे धाडस ठेव. उगाच कृत्रिम विचार करून तरसवू नकोस स्वतःला. असं किंवा तसं हा विचारच कशाला करायचा? परिस्थितीनुसार जे घडायचे, ते घडणारच आहे. तू अपंग आहे ही परिस्थिती तुला व्हीलचेअरचा पर्याय मिळवून गेलीच ना? तसेच साऱ्या बाबींचे. उपचार नसले तरी पर्याय असतोच."

सईचा प्रयत्न सफल होईल अशी सध्याची प्राजक्ताची मनस्थितीच नव्हती

सईने विप्लवचे बोलणे ऐकले नाही ना आणि तिचा ज्योतिषावर विश्वासही नाही. म्हणून ती असे बोलत आहे. आपल्याला काकांनी सांगितलेली सर्व भविष्ये खरी ठरली होती. त्यांच्या म्हणण्यावर आपला पूर्ण विश्वास होता. त्यातल्या त्यात आपल्याला ते पडलेले स्वप्न, हल्ली आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांना दुजोरा देणारे होते म्हणून आपल्याला चिंता वाटत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणि त्या काकांच्या सुद्धा! तो बरा होईल, चालायला लागेल, फिरायला लागेल, सर्वसामान्यांप्रमाणे स्वतःचे स्वतः करू लागेल असे आपल्याला सारखे वाटत आहे.

त्या बरा झालेल्या विप्लवला प्राजक्तासारख्या परान्नपुष्ट व्यक्तीची आता गरज कशी असणार? एवढा हुशार, मोठा कलावंत होण्याची त्याच्यात क्षमता आहे. आतापर्यंत त्याच्या त्या अवस्थेमुळे त्याच्यावर मर्यादा होती. ती आता असणार नाही. तो मोठा व्हावा पण त्याने आपल्याला सोडू नये, त्याच्या सर्व सर्व यशात आपण सहभागी असावे असे तिला या दोन दिवसापूर्वीपर्यंत वाटायचे; पण हे सारे बघता तसे होईल असे या घडीला प्राजक्ताला वाटत नाही आहे.

"जे होत असते परिस्थितीनुसार, कृतीनुसार होत असते आणि जे होते ते मोकळ्या मनाने स्वीकारले पाहिजे!"

विप्लवच्या अशा सततच्या बोलण्याने प्राजक्ताच्या मनात हल्ली फार गोंधळ माजला आहे. या शस्त्रक्रिया व्हायच्या नसत्या तर असले विचार तिच्या मनात आलेच नसते. असे एकूण तिच्या हळव्या, कोवळ्या व अत्यंत भावुक मनाची अवस्था बघितल्यावर वाटल्यावाचून राहत नाही.

वारा सुसाट सुटला की, झाडांची पाने जोरात फडफडू लागतात. पिकली पाने जोमाने गळू लागतात. विचारांच्या वादळामुळे अशीच फडफड, सडसड प्राजक्ताच्या मनात चालली होती. आणि तिच्या कमजोर, अगदीच लुळ्या विचारांना हादरे बसत होते.

प्राजक्ताला आता कोणत्याच प्रकारे समजावून काही होणार नाही असे तिची अवस्था बघता सईला एव्हाना उमगले होते.

"प्राजक्ता तू फक्त ह्या शस्त्रक्रिया होईस्तोवर शांत राहावंस! ज्यावर काही नसतो त्यावर काळ हाच एक जालीम उपाय असतो. म्हणून आता फक्त वाट बघणे एवढेच तुझ्या हाती आहे." सईचं एवढंच समजावणीचं बोलणं बाकी होतं. ती ते बोलली.

सई शुक्रवारला परत जाणार होती. सोबत तिचा मुलगा सार्थकही होता. तो आता पाच वर्षाचा आहे. ते दोघेही मायलेक जाणार होते. येथे ते पंधरा दिवसांसाठी आले होते. अशोकला रजा मिळाली नव्हती. नंतर एक वर्षाने सगळी फॅमिली येणार होती.

"बरं जास्त विचार करू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस! बाय, येते मी. आणि हो कोणतीही नकारात्मक घटना, दृष्य, विचार बघून, ऐकून त्या आपल्याशीच निगडित आहेत असा भ्रम पाडू नकोस! मला कळले तू ते बाहेरचे विरहाचे दृष्य बघून पुन्हा जास्तच कष्टी झाली होती. निगेटिव्ह थिंकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ, डार्लिंग!" एवढे बोलून साईंनी निरोप घेतला.

या चारच दिवसात चेहऱ्यावरचा ओलावा सुकलेली प्राजक्ता वाळवंटाप्रमाणे भकास दिसत होती. विप्लव बरा झाल्यावर आपल्याला नेहमीसाठी सोडून जाईल, ही विलक्षण भीती प्राजक्ताच्या मनात फेविकलच्या मजबूत जोड सारखी चिकटून बसली होती. शस्त्रक्रिया होईपर्यंत तरी ती सुटणारी नव्हती. हे अगदीच स्पष्ट होते.

इकडे प्राजक्ताची शस्त्रक्रिया सुरू करण्याचा दिवस उजाडला. आणि तिकडे मुंबईत विप्लव ऑपरेशन झाल्यानंतर सुन्नपणातून बाहेर पडत होता. नागपुरात प्राजक्ताचे ऑपरेशन यशस्वीरीत्या आटोपले. ती पूर्णपूर्ण सचेत झाल्यावर तिला फोनवरून कळले होते की, विप्लवची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली.

हे कळताच प्राजक्ता कमालीची खिन्न झाली. तिचा दुखावेग अनावर झाला. पण तिच्या मनात पूर्वीची भीती, तो त्रागा, तो गोंधळ जसाच्या तसा नव्हता. या साऱ्याची जागा आता विप्लवप्रतीच्या गाढ सहानुभूतीने घेतली होती. तिच्या मनाला विप्लव बरा होणार नव्हता याचे अतोनात दुःख होते. प्राजक्ता पायाच्या अंगठ्याकडे एकटक बघत मनसोक्त रडत होती. तिचे आताचे अश्रू फारच खेदाचे होते. 'आपण किती किती विकृत पद्धतीने विचार केला होता?' याचा तिला पराकोटीचा संताप येत होता. मनात कुठेतरी पाश्चातापाचे भाव तीव्रपणे उमटले होते. त्यामुळेच ती विप्लवविषयीची उत्कटता मनातून व्यक्त करत होती. तिची त्या अवस्थेतली नजर दुसऱ्या पायावर सरकली, सरकली आणि तेव्हाच तिच्या मनाची चीत बाजू पटामध्ये बदलली. का? तर....त्या अंगठ्याच्या हालचाली बघून विप्लवच्या दुःखाच्या अपरिहार्यतेच्या विचाराचे पर्यावसान त्याक्षणी किंचित का होईना आनंदात नक्कीच झाले होते.

प्राजक्ताची शस्त्रक्रिया सफल झाली होती. याचा तिला हिमालय थिटा, दर्या सरोवर आणि आकाश ठेंगणे वाटावे एवढा आनंद झाला होता. ती आता बरं झाल्याची पूर्ण खात्री होण्यासाठी हालचालींची प्रात्यक्षिक बाकी होती. ते आता पुढील काही दिवसात डॉक्टरांकडून पूर्ण झाल्यावरच कळणार होते; पण या क्षणी त्या अंगठ्याच्या हालचालीमुळे आपण आता नक्की पूर्णपणे बरे होऊ! हा फील प्राजक्ताच्या मनात प्रचंड ताकदीने उर्जावान झाला होता.

तिची बरी होण्याच्या दिशेने धडपड सुरू झाली होती. दिवस जात राहिले. प्राजक्ताची हालचाल पौर्णिमेच्या कौमुदीप्रमाणे गतीमान झाली होती. ती दवाखान्यातल्या खोलीमध्ये डॉक्टरांच्या, वाकरच्या, रॅम्पच्या सहाय्याने हळूहळू चालायला लागली. व्हारेलचेअर जाऊन हाती काठी आली. प्राजक्ताने जग जिंकलं. व्हाईलचेअर आलेल्या प्राजक्ताला चालायला लागल्यावरच दवाखान्यातून सुटी मिळाली.

आता ती नुसत्याच काठीचा आधार घेत चालू लागली. घराच्या प्रांगणात सारखी सारखी इकडून तिकडे तिकडून इकडे येरझारा मारू लागली. अचाट सामर्थ्य लावून चालण्याचा सराव करू लागली. आजवरच्या आयुष्यातील बाकी राहिलेले चालणे ती एकाच दमात पूर्ण करीत होती. की तिला झालेल्या अपरंपार आनंदाचा तो परिणाम होता, काय कोण जाणे!

महिन्याभरापासून प्राजक्ता रोज सकाळी बागेत फिरायला जाऊ लागली होती. दिवसामागून दिवस उलटत होते. वाळलेल्या खोडाला ओलाव्यामुळे पालवी फुटावी आणि तो वृक्ष कंचपणाने बहरून यावा तशी प्राजक्ता बहरुन आली होती. तिची हालचाल संथ गतीने आसमंत गाठत होती. टाकलेल्या कातीकडे सर्प पुन्हा ढुंकूनही बघत नाही. प्राजक्ताही आपल्या अपंग अवस्थेतून निवृत्त झाली होती. तिलाही आपली ती अपंग अवस्था आठवायची नव्हती.

एक दिवस बागेतून फिरून घरी परतायला सडक पार करत असताना अचानक एका कारनी प्राजक्ताच्या पुढ्यात ब्रेक मारला.

"डोळे आहेत की फुटले, सडक पार करताना डोळे उघडे ठेवायला काय होते तुम्हाला?"
चित्रपटातल्या अभिनेत्यासारख्याच सहजतेने संवाद फेकत कारचा मालक गाडीतुन बाहेर पडला.

प्राजक्ता धास्तावून सडकेवर कोसळली. तिला बघताच "सॉरी, सॉरी, मॅडम." म्हणत कार मालक प्राजक्ताला उठायला मदत करू लागला. त्याच्याशी नजर भिडताच प्राजक्ता विनयाने सावरली.

"नको नको मी सावरते स्वतःला." असे म्हणून ती स्वतःच उभी झाली. आणि तिने डोके वर करून विनम्रकडे बघितले. तेव्हा ती अशी काही लाजली की, त्या लाजण्याचा अर्थ बघणाऱ्याला सहज कळावा. त्याक्षणी तिच्या मनाच्या मोबाईलमध्ये सुगंधी संगीत वाजत होते.

इथे निसर्गनियम हावी झाला होता. माणूस सदैव आणि पराकोटीचा निस्वार्थी कधीच होऊ शकत नाही. जीवनात असा एखादा क्षण येतोच जेव्हा त्याला स्वार्थाचा विचार करावाच लागतो. आत्ताची प्राजक्ताची नेमकी तीच अवस्था होती. आता ती आकर्षणाला भाळली होती. तिच्या मनात हळुवार भावना पुनर्जीवित झाल्या होत्या. आता इथे फक्त विप्लवची जागा विनम्रनी घेतली होती.

"माफ करा, तुमच्या अवस्थेकडे माझे लक्षच नव्हते." स्वतःचा दोष कबूल करत विनम्र म्हणाला.

त्यानेच नम्रपणे प्राजक्ताला गाडीतून घराकडे पोचती केली. तो तिला घरी सोडून जाऊ लागला. त्याची कार रस्त्यावर विरघळत पर्यंत प्राजक्ता ती कडे किरणांच्या नजरेने बघत होती. आईच्या हाकेनेच तिला घरात जायचे सुचले. विनम्रची ती एकच नजर त्या क्षणापासून प्राजक्ताच्या मनावर अधिराज्य गाजवत होती.

प्राजक्ता आता जुने सारे सारे विसरून, नवे आरोग्य, नवे स्वातंत्र्य, नवे प्रेम, नव्या भावना, नवी आशा आता तिला सार्‍याच नव्यानव्याचाच ध्यास लागला होता. तिला तिच्या आरोग्यासह, स्वातंत्र्यासह तिच्या परीने नवं प्रेम गवसलं होतं. आता विनम्र हाच आपलं सर्वस्व असणार. असा पहिल्या भेटीपासूनच तिने मनाशी चंग बांधला होता. तिच्या ह्या नव्या सुखकर भावना आरोग्याला, शरीराला, आत्मविश्वासाला झळाळी, चकाकी देत होत्या. आता ती रोज नव्या तेजाने झळकत होती.
शरीराला, मनाला, भावनांना सारंच काही पोषक असं लाभत गेलं की ते पुन्हा पुन्हा पुष्ट होत जाते, हेच खरं.

प्राजक्ता रोज ज्या बागेत फिरायला जायची त्याच बागेत पंधरा दिवसांनी तिला सकाळी सकाळी चक्क विनम्रचे दर्शन झाले. त्याला असे अचानक बघून ती मोहरली. तिला वाटले हा भास असावा म्हणून दुर्लक्ष करून जाऊ लागली. ती थांबली, तो विनम्रचा "नमस्कार मॅडम" असा आवाज ऐकूनच. त्या आवाजाने तिच्या हृदयाचे ठोके गतिमान झाले होते. ती ते सावरण्याचा प्रयत्न करतच म्हणाली.

"आज इकडे कसे? याआधी कधी बघितले नाही, या बागेत तुम्हाला."

"कळत नाहीये, मला का या बागेची ओढ लागलीय ते? दोन दिवस झाले मी या बागेत येतोय; पण आजची रौनक काही औरच वाटते."

"का? आज असे काय झाले?" प्राजक्ताने विचारले.

"बागेत फुले मुबलक असतात; पण वातावरणाला संजीव करते ती सुगंधी फुलेच."

विनम्रचा रोख प्राजक्ताला कळला. ती शांत झाली. तिच्या गालावर चढलेली लाली नजरेत सहज भरणारी होती. विनम्रला तिची जमीन मशागतीने युक्त जाणवली. या भुईत त्याच्या प्रीतीची बाग फुलणार याची खातरजमा झाली होती. मग थेट त्यांने आपल्या प्रेमाचा प्रस्ताव प्राजक्तापुढे ठेवून दिला. प्राजक्ता अस्पष्ट दिसणारा होकाराचा पदर पसुरूनच होती. त्याचे प्रस्तावाचे फुल तिच्या होकाराच्या पदरात अलगद जाऊन अडकले. आता रोज या बागेत आपल्या भेटी होतील! असे परस्परास आश्वासन देऊनच दोघेही माघारी फिरले.

प्राजक्ताला परत एकदा प्रेम झाले होते. तिच्या या प्रेमाच्या हिरव्या झाडावर आनंदाच्या विविध पाखरांनी बसायला सुरुवात केली. तिचे मन स्वतःला समजावीत होते. आता स्वतः इतरांप्रमाणे आपण चालू फिरू लागलो आहोत. आजवरच्या बेडवर आणि व्हीलचेअरवरच्या घालवलेल्या आयुष्यात घरूनच का असेना आपण शिकलो. डिग्री घेतली. आपल्याचसारखी देहगत असलेल्या म्हणजे -आताच्या भाषेत नाही तेव्हाच्या- अपंग असलेल्या प्रतिभावान चित्रकाराशी, कोमल हृदयाच्या कवीशी प्रेम केले होते. किती किती एकमेकाशी जुळले होतो आम्ही. मी खूप खूप भाऊक स्वभावाची आणि तो कमालीचा तत्त्वज्ञानी. प्रत्येक गोष्टींचा जरा त्रयस्थपणे विचार करणारा. आपल्याला कोणत्या गोष्टीचे आकर्षण वाटू लागले की तिच्याप्रती सजाण करत त्या सौंदर्याला काहीशी बाधा आणणारा; पण विप्लव त्याच्या या समजीमुळे आणि विलक्षण प्रतिभेमुळे आपल्याला हवासा वाटत राहिला. त्यामुळेच त्याच्यावर आपले अपार प्रेम होते; पण हे प्रेम आपण त्या अवस्थेत होतो म्हणून होते? की इतर कुणी चांगली व्यक्ती आपल्याला प्रेम करणार नव्हती, म्हणून होते? की ते आपल्या मनाची, देहाची गरज म्हणून होते?

आता आपल्याला याबद्दल काही, काहीच सांगता येणार नाही. ते तेव्हाचे दिवस होते. आणि आता ते मागे पडले आहेत. तो भूतकाळ आता आपल्याला मागेच ठेवायचा आहे. भलेही तेव्हा आपल्याला वाटले होते की विप्लव बरा झाला, तर आपल्याला सोडून जाईल; पण असे उलटे होईल अशी आपण कल्पनासुद्धा केली नव्हती. का? का? आपल्याला आपल्या दुबळेपणाची जाणीव नव्हती, का? आपण विप्लववर हा दोषारोप करत राहिलो? त्या विचारांमुळे आपण किती दुखी होतो? त्या क्षणी आपल्या मनात किती पराकोटीचे स्वार्थ दाटून आले होते? आणि आता? आता तरी आपल्या मनातून तो स्वार्थी विचार कुठे संपला आहे? आता या एवढ्या काळात अपल्यालाला विप्लवची जरा देखील आठवण झाली का?आपण आपली अर्धी अधिक संवेदना गमावली हेच खरे!

आता विप्लव कुठे असेल? कसा असेल तो? त्याच्या मनाची अवस्था कशी असेल? नाही नाही तो प्रत्येक गोष्टीचा बारीक आणि तात्विक विचार करत असतो. त्याला याबद्दल काही काहीच वाटणार नाही. वाटले तरी तो या सगळ्यांचा सुक्ष्मत्तर विचार करून या घटनांचा मेळ समजून घेईल. ठरले ना आपले आपण आता भूतकाळ विसरायचा! तर विसरायचाच!

तर मग आपण आता परत प्रेमात पडलो. आपल्या त्या आणि या आयुष्यात प्रचंड तफावत आहे; म्हणून आता आपल्याला पुढे बघायचे, पुढे जगायचे आहे. तर मग आता पुढच्याच विचार करायचा! विनम्र.... आता आपण विनम्रसाठीच जगायचं! आपल्यासाठी जगायचं!

प्राजक्ताने मोठ्या चतुराईने भूतकाळ आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात दडवण्याचा प्रयत्न केला.

पंधरा दिवसातच विनम्र व प्राजक्ता यांची काव्यमय प्रेम कथा तालुक्यातील प्रत्येक सान थोरांच्या मुखामुखावर रूढ झाली. त्यांच्या प्रेमाची कळी टपोर फुल बनून आसमंतात सुगंध पसरवीत होती. काळ सुसाट पळत होता. दिवस मास कधी उलटले आणि वर्ष कधी संपलं कळलंच नाही.

एकूण वर्षभराचा काळ लोटल्यानंतर प्राजक्ताची आणि सईची अचानक भेट झाली, ती नागपूरच्या प्रशस्त अशा बसस्थानकावर. तेव्हा प्राजक्ता विप्लव सोबत फिरायला गेली होती. तेव्हा अचानक सई व तिच्या कुटुंबास बघताच आवक झाली आणि सई प्राजक्ताला बघून तिकडे चकित! दोघींनी एकमेकींस क्षणभरच का होईना, आश्चर्याचा धक्का दिला होता! प्राजक्ता सारखी बघतच होती कारण तिच्या दृष्टीस अनाकलनीय अदृश्य पडले होते. आणि सईला प्राजक्ताची अपेक्षित अवस्था नजरेस पडली होती. पण ही आश्चर्य व्यक्त करण्याची वेळ नव्हतीच मुळी. अशोक ज्या व्हीलचेअरवर बसला होता, तिला ढकलत सई प्राजक्ताच्या दिशेने येत होती. आणि प्राजक्ता काठीचा आधार घेत विनम्रसोबत सईकडे. दोन महिन्यांपूर्वी अशोकचा रेल्वेतून उतरताना अपघात झाला होता. म्हणून सई आपल्या कुटुंबास घेऊन मायदेशी परत आली होती.

दोघींचीही गळा भेट झाली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू गळत होते. काय बोलावं दोघींनाही काहीच सुचत नव्हते. वातावरण निशब्द झालं होतं. प्रदीर्घ श्वास घेत प्राजक्ता म्हणाली.

"हे सगळं काय झालं ग सई?"

"मी इथून गेल्यागेल्या महिन्याभरातच हा सगळा प्रसंग घडला. आता जवळपास वर्ष होत आहे अशोक असा व्हीलचेअरवर आहे. बघ जीवन हे असं असते प्राजु, आपण जे स्वप्न बघतो, जो विचार करतो, ज्या अपेक्षा करतो नेमकं तसं कधीच होत नसते. जगत असताना अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांना गृहीत धरूनच जगावे लागते. जे माझ्या जीवनात घडले, मी कुठे असे ठरवले होते? आणि तुला सुद्धा तू चालशील असे कुठे वाटले होते? जीवन हे एक विरोधाभासाचे गाठोडे आहे."

जीवनाचे सार सांगून सई चालली होती. प्राजक्ता अंतर्मुख होत सईकडे एकटक बघत राहिली.

विप्लवची सहा सहा महिन्यांनी दोनदा शस्त्रक्रिया झाल्यावर दोन वर्षानंतरची ही सारी हकीकत प्रतीकने विप्लवपुढे कथन केली. ती ऐकून त्याच्या चेहऱ्यावर कळवट स्मित उमटले आणि आयुष्य हे काळ, परिस्थिती, स्वभाव, स्वार्थ इत्यादीनुसार बदलत असते, याची त्याला पुन्हा दृढतेने जाणीव झाली.

-मनोज बोबडे

हे असं आहे तर...

  सूर्य डोक्यावर चढल्याने देहछाया अस्तित्वहीन झाली होती. कोणत्याच सरळ रेषी वस्तू प्राण्यांना सावलीची सोबत उरली नव्हती. सावलीविना एकाकी असण्य...