1. जीवांचे वैशिष्ट्य आणि विविधता
जगात किती माणसे असतील? बुद्धिमान मानव उत्क्रांत झाल्यापासून अशी किती माणसे जन्मून मृत्यू पावली असतील? असंख्य, अगणित, असेच त्याचे उत्तर आहे. आजवर मृत्यू पावलेल्या किंवा जगभर हयात असलेल्या माणसांचे एक दुसऱ्याशी साम्य वा साधर्म्य शोधले आणि ते शक्यही झाले तरी ते कुठल्याच बाबतीत समान आहे असे म्हणता येत नाही. हिच तर आहे माणसांची, नव्हे प्रत्येक जीवाची अनन्यता. कुठलाही जीव इतर कुणासारखा नसणे हीच हर एक जीवाची आगळी खासियत होय!
2. व्यक्ती इतक्या प्रवृत्ती – विविधतेचे सौंदर्य
याच माणसांच्या, जीवांच्या आगळेपणास अनुलक्षून माननीय स्वभावास जाणणाऱ्या तत्त्वज्ञानांनी 'व्यक्ती इतक्या प्रवृत्ती' या म्हणीस जन्माला घातले.
प्रत्येकाची आपली एक अनन्य प्रवृत्तीच विविधतेने ही सृष्टी नटवत असते. गुलाबाचे लाल रंगाचे फुल, दुसऱ्या गुलाबी रंगाच्या गुलाबाच्या फुलासारखे नसते. त्याच्या पाकळ्या वेगळ्या, ठेवण वेगळी, रंगछटा वेगळ्या. फुल गुलाबाचेच पण विभिन्न रंग, ढंगांमुळे ते सौंदर्यासक्त मनाला आकर्षित करत असते. बेडूक- किती निरनिराळ्या आकारांचे, चमकील्या रंगांचे असतात. माकडांच्या जाती, घोड्यांच्या जाती बघा! वाघ, हरीण, उंट, गाई, चिमण्या, कावळे, पोपट, बगळे, हंस कितीतरी जीवांच्या प्रजाती, स्वतंत्र अस्तित्व घेऊन आहेत. स्वच्छंदपणे विहारत आहेत. आपले अनमोल जीवन मनस्वीपणे जगून संपून जात आहेत.
3. साचेबद्धतेचा धोका
आणि माणूस आपल्या अमूल्य जीवनाचा हवा तसा मनःपूर्वक आस्वाद न घेता, आपल्याच जगण्याला, आवश्यकतेला अपमानित करत जातो. आपल्या निकडी, आपली सौख्ये सोडून पारलौकिक भ्रम जालात देखणे लौकिक गमावून बसतो. सर्वांना एकाच रंगात रंगविण्याचा असफल प्रयत्न करत, जीवनाचे वैविध्य संपवून साचेबद्धता आणू पाहतो.
4. एकरूपतेमागची सत्तेची रणनीती
या एकाच रंगाचा आग्रह धरणाऱ्यांना खरे तर तोच रंग प्रिय असतो असे नसते. प्रत्येकच जीवाला विविधता जगाविशी वाटते. हे ते स्पष्टपणे जाणून असतात. फक्त आपल्याला राजकीय हेतूपायी विशिष्टांची मर्जी राखली जावी यासाठी त्यांच्याकडून ही एक रंगी मानसिकता मुद्दामहून स्थापित केली जाते. ही जेवढी अदृश्य तेवढीच स्पष्ट असणारी शक्ती आपला समाजावरचा अंमल कायम राहावा म्हणूनच झटत असते. ज्यायोगे तिची समाजावरची पकड मजबूत राखण्यास तिला सुलभ जाईल. आणि याच आधारावर विशिष्टांना आपली मक्तेदारी शाबूत ठेवता येईल!
5. धर्म व वर्चस्ववादाचे राजकारण
या साऱ्या बाबींसाठी देव, धर्म, जात, स्पृश्यास्पृश्य, भेद, भांडवलशाही, पुरोहितशाही, राजेशाही आदींच्या आधारे त्यांची वर्चस्ववादी मानसिकता काटेकोरपणे कार्यरत असते. काळ बदलत राहतो तसतशा या बाबींमध्येही काळानुरूप सोयीनुसार बदल घडविला जातो.
6. कोवळ्या मनांवर कट्टरवादाचा प्रभाव
धर्माच्या बाबतीतच विचार केला तर तो कालबाह्य ठरू लागलाय हे कळता कळताच मागच्या दाराने धर्माभिमानी, वर्णभिमानी, जात्याभिमानी गट कोवळ्या मनाला दिशा देत धर्माचे, वर्चस्ववादाचे कट्टरपणे प्रस्थापण करत आलेले असतात. त्यामुळेच या दहा-बारा वर्षातील सनातनी राजकारण्यांचा धर्म, जाती, वर्ण, भेद आदींचा पराकोटीचा कट्टरवाद सर्वसामान्यांच्या, इतर धर्मियांच्या मनात भीतीला आणि तिरस्काराला जन्म देत आहे.
7. तरुण पिढीचे मानसिक खच्चीकरण
अशाच प्रवृत्तीचा सभोवतालील प्रभाव, धार्मिक जहालवादातून, अंधश्रद्धेतून नुकतेच बाहेर पडू पाहणाऱ्यांनाही परत त्याच चौकटीत बंदिस्त करत असल्याचे चित्र उभे होत आहे. विविध संस्कृतीच्या वटवृक्षाखाली फुलारणाऱ्या कोवळ्या मानसिकतेला धार्मिक साचेबद्धता प्रदान केली जातेय. देवा, धर्माचा कोळी निरामय मनाला आपल्या जाळ्यात अडकवत आहे. त्यामुळे एका स्तरावर बघता ही अतिशय चिंतनीय गोष्ट आहे. हा भयंकर असा हट्टाग्रही वाद या तरुण कोवळ्या पिढीचे मानसिक खच्चीकरण करत आहे. ह्या साऱ्या प्रभावांचा परिणाम परधर्म, परजातीच्या द्वेषाला पुन्हा पुन्हा बळ देत आहे.
8. आशा – निराशेवर उपाय
तरी निराशा बाळगणे हा यावरील उपाय नव्हे. मानवी मन तसे संवेदनशीलच असते. एका मर्यादेपर्यंत ते द्वेषाधिन असले तरी त्याच्या जीवनातील एखादी घटना त्याच्या विचाराला कलाटणी देणारी ठरते. या विधायक दिशा देणाऱ्या घटना घडत राहिल्या तरच या संवेदना 'रिबुट' होत असतात. परंतु ही संवेदना मृत करण्याचं काम करणारी शक्ती हावी होत राहिली तर कठीण असते. ह्या असल्या शक्तींचा जोर वाढू देणे हे सामाजिक न्यायाची चाळ असणाऱ्या आपल्यापैकी कुणालाच परवडणारे नाही. म्हणून या कठीणपणावरचा जालीम उपाय घडणाऱ्या घटना आणि काळ हाच असतो. तरी आपल्या स्तरावरचे जोरदार प्रयत्न करत राहणेच आपल्या हातात!
9. सजगतेची गरज आणि आशेचा झरा
याबाबतीत असरदारपणे काम करणाऱ्यांनी कुतूहल आणि जिज्ञासा मना मनात जागवत राहायला हवे! या उपरांत यांना शांत करण्यासाठी ही प्रकृती आहेच. या उत्सुकता आणि तीव्र इच्छा आदि प्रवृत्तीला शांत करणारी जिथे धडपड आहे; तिथे आशा कायम प्रवाहित असते. म्हणून या घटकांना कधीही लुळे पडू देता कामा नये. यासाठी आपण कायम सजग राहिले पाहिजे!
- मनोज बोबडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा