गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

पूजापाठ


पूजेच्या निमित्ते| बदाम खारका|
मागतो सारखा| पुजारी तो||

अनाजाने थैली| भरुनिया घट्ट|
दक्षिणाही लठ्ठ| हवी त्याला||

पुजेला सफल| करण्यास चट|
हवाच तो भट| वादे सदा||

प्राबल्य राखण्या| माहात्म्य सांगती|
स्थान ते ठेवती| आरक्षित||

दुःखी, भयग्रस्त| जनतेस भोळ्या|
सांगून कागाड्या| लुबाडती||

आपल्या विवेका| विचारावे सत्य|
किती अशा तथ्य| प्रकारात||

गाडगेबाबा ते| म्हणे या नादात|
फुका या फंदात| पडू नका||

मनोज बोबडे (‘व्हीलचेअर’मधून)

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

विचारधन २


धर्म

...धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही. आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सदगृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे. मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे. असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायम स्वरूपी कमकुवत बनविणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच कमकुवत बनविणे आहे.....

                                (शहीद भगत सिंह समग्र वाड्मय. पृ. २०७)


आत्म्याचे अमरत्व

...अमरात्वावर ज्यांचा विश्वास आहे असा एखादा माणूस जर तुम्हाला भेटला तर मग तुमची कोणतीच इच्छा अपुरी राहणार नाही. हे नक्की समजा, की तुम्ही त्याच्या सर्वच वस्तू घेऊ शकता-अगदी तुम्हाला वाटले तर तुम्ही जिवंतपणी त्याची कातडीही सोलून घेऊ शकता. आणि तो ती तुम्हाला देण्यास आनंदाने तयार होईल....

                                 (अप्टन सिंक्लेयर ४०३ सी. जी.)

ईश्वर

...परमेश्वराने हे दुःखाने भरलेले जग का निर्माण केले? केवळ तमाशा बघण्यासाठी? असे असेल तर मग तो क्रूर सम्राट निरोपेक्षाही भयंकर जुलमी आहे. हा काय त्याचा चमत्कार असावा? पण असल्या चमत्कारी ईश्वराची गरज काय आहे?.....स्वार्थी लोकांनी, भांडवलदारांनी धर्माला नेहमीच स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वापरून घेतले आहे. इतिहास याला साक्ष आहे. ‘धीर धरा!’ आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा! असे सांगणाऱ्या तत्वज्ञानाने ज्या यातना दिल्या आहेत, ते सर्वच जण जाणतात.
      लोक म्हणतात, की परमेश्वराचे अस्तित्वच जर नाकारले तर काय होईल? जगात पापे वाढतील, अंधाधुंदी माजेल परंतु अराज्यवादी म्हणतात, की त्यावेळी माणूस स्वतःच एवढा उत्तुंग झालेला असेल, की स्वर्गाची लालूच व नरकाचे भय न दाखवताही तो दुष्कृत्यापासून दूर राहिल. आणि प्रामाणिकपणाने कार्य करेल! तो एकदा स्वतंत्र झाला, तर त्याचे जीवन फारच उन्नत होईल....

                             (शहीद भागत सिंह समग्र वाड्मय. पृ. २४४-२५६)

मिथके

...सत्ये दोन प्रकारची असतात, अशी माझी भूमिका आहे. एक सत्य विज्ञान, इतिहास वगैरेंच्या कसोटीवर घासून पाहायचे असते, त्याची तार्किक चिकित्सा करायची असते. याउलट एक सत्य तर्काच्या कसोटीवर पाहायचे असते. त्याला भावना आणि श्रद्धा यांचे अधिष्ठान असते. केवळ वैज्ञानिक सत्य माणसाच्या सर्व गरजा भागवू शकत नाही. माणूस केवळ तर्कावर जगणारा प्राणी नाही. त्याला काही वेगळ्या गोष्टींचीही आवश्यकता असते. आणि ती पूर्ण करण्याचे काम चांगली मिथके करतात....
      मिथके ही शोषण, अन्याय, अद्न्यान इ. गोष्टींचा प्रसार करीत असतील, तर ती नाकारलीच पाहिजेत. परंतु ज्या मिथकांना अशा प्रकारचा डाग लागलेला नसतो, जी उत्कट भावनात्मक आनंद देतात, मानवी मनाला उन्नत करतात ती मिथके नाकारण्याचे कारण नाही....

                          (सर्वोत्तम भूमिपुत्र: आक्षेप ले. डॉ. आ. ह. साळुंखे)









शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

बिनसायसे घडे न काही


नवल नको रे मना बाळगू
सृष्टी ही चालते कशी?
जीवित सार उरात पुरे
घेऊन निपजली उमलायाशी

चालक नच आणिक कोणता
खुद्द चराचर फुलफळणारे
मातीमधले निरासवे बीज
अंकुरण्याशी धडपडणारे

बिनसायासे घडे न काही
कार्य कारणासवे जागती
जयास काही हवे हासण्या
स्वार्थ न्याये अन्यास मागती

कोण कोठला देव येतसे
गरज जाणोनी देण्या भौतिक?
सुखे नांदतो इथेच नर तो
मिळवील जो कष्टाने मौतिक

इथे प्रेमाने भरभरला तो
मानवतेची चाळ जयाला
वागणे सिमाहीन असेल ज्याचे
सृष्टी ही नच दे स्थान तयाला


मनोज बोबडे (‘परिमळ’ मधून) 

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

विजय



मातेच्या टेकून ताठ शीर चरणाशी
निघे वीर जय संपादन करण्याशी

ते लक्ष्य एकले उरात घेऊन जाता
रांगडा धुमाकूळ रणात माजला होता

त्या समर वीराने दश शकले पाडून
हद्दी फडकीला निशाण तो गाडून

जय-अभिमाने फुगून आली छाती
अन् प्रिय आईची मस्तकी लावली माती

त्या वीर कृतीने विजयी झाला देश
जनतेत अन् सुटले ईश पूजण्या आदेश

प्रारब्ध कुणी, कुणी म्हणती सुकृत याशी
नच वावच इथल्या मिळतो सत्कार्माशी!

मनोज बोबडे (‘परिमळ’ या कवितासंग्रहातून)

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

त्याग भोगीच बरवा


ह्या जगात सारंच आहे, नाही असं काहीच नाही. तरी माणूस साऱ्याच गोष्टींचा अंगीकार करून जगू शकत नाही. त्याला जेवढ्या गोष्टींची गरज आहे तेवढ्याच अंगीकारून तो आनंदाने नांदू शकतो. आणि शक्याशक्यतेच्या दृष्टीने बघता हाच न्याय आहे. फक्त दोनच गोष्टींनी साकारलेलं हे जग ...यात कोणत्या एकाशी सलगी केली की दुसऱ्याशी विलग व्हावेच लागते.
      तसे दोन्हीन्च्यामध्ये राहून स्वर्णमध्य साधत माणूस आपले जगणे सुकर करू शकतो. परंतु त्यात दुटप्पीपणाचा आरोप भाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या बुद्धीच्या, मनाच्या, विचाराच्या अनुरूप असणाऱ्या गोष्टींचा स्वीकार न्यायाचा ठरतो.
      निक्या सत्वामध्ये मोडणाऱ्या, स्वतःला स्वास्थ्यकारक ठरणाऱ्या, मनाची घुसमट न करणाऱ्या बाकी फोलपट, अप्रिय वजा केल्या जाणाऱ्या बाबी अनुकरणीय ठरायला हव्यात! मानवतेला उजागर करणाऱ्या नीतीमूल्यांचे समर्थन करणे केव्हाही सत्कार्यच ठरू शकते, कोण्या सीमित व्यवस्थेला, वर्तुळप्रीय भावनेला, स्वश्रेष्ट-परदुष्टपणाच्या विचाराला थारा देणाऱ्या मानसिकतेला ‘विकृती’ हीच संज्ञा योग्य म्हणायला हवी.
      जीव हा कोणताच अकर्मी असू शकत अनाही. त्याला गरज आणि आवड असल्याने त्याच्यामध्ये भोगाची लालसा ही जन्मताच भेट रूपानं लाभलेली असते. म्हणून प्रत्येक जण येथे उपभोग घेण्यासाठी धडपडत असतो. मग तो त्यागीपाणाचा आव आणून का असेना-धडपडणे हे असतेच! परंतु भोगाची अतिशयोक्ती माणसाला माणूसपणापासून दूर लोटत असते. आणि तो मर्यादेतील जीवनाचा सुंदर आस्वाद गमावून बसतो! भोगीवृत्तीमुळे तो रोगी झाल्याचे प्रत्ययास येते.
      जीवनाचा भोग, आस्वाद, आनंद घेणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्यच आहे, त्याचा तो हक्क आहे. फक्त हे घेताना त्याला ताळतंत्र जपता यावं, ही अट आहे. अन्यथा वहावणेच आहे. भोक्तेपणात द्रष्टेपणा असणाऱ्याकडे जीवन जगण्याची कला आहे असे म्हणता येते. त्याच्याकडे आनंद आहे, हर्ष आहे, सुख आहे, आशा आहे, उमेद आहे, प्रेम आहे, ललक आहे एकंदरीत त्याच्याकडे सौंदर्य आहे.
      संत तुकोबारायांच्या ह्या अभंग ओळी तसल्याच सुंदरपणाची जाणीव करून देतात...

            भोग द्यावे देवा| त्याग भोगीच बरवा||
            वन्चकाशी दोष| तुका म्हणे मिथ्या सोस||
     
म्हणून त्याग आणि भोग हे दोनही परस्परांशी घट्ट नाते सांगणारे आहे. त्याग कोण करू शकतो? जो भोग घेत असतो तो! आणि त्याग केला की त्याची भोगाची लालसा बळावते! त्याग आणि भोग यांची अतिशयता बरी नाही यावर भाष्य करणारी ही चारोळी वास्तविकता मांडणारी आहे....

            भोगाशिवाय त्याग नाही
            त्यागाशिवाय भोग नाही
            दोहोतही टोकाने वागण्याइतका
            जगात अन्य रोग नाही....


मनोज बोबडे




गोड तुझा अनुराग


कसे भावनेने व्याप्त
आई तुझे अंतरंग
माझ्या मनात दाटले
असे विचार तरंग

तुझ्यामुळे ह्या जीवास
मिळे पाहण्यास जग
देई चैतन्य मानसी
गोड तुझा अनुराग

खल औलादीस राहे
कुठे ऋणाची जाणीव
कलेवरात टाकते
तूच वात्सल्याने जीव

माये माझे माऊली गे
ममतेचा तू सागर
हीन शिणल्या जीवास
तूच विसाव्याचे घर

तुझ्यामुळेच माऊली
बालकाचे संगोपन
मानवता उभी आहे
तग धरुनी अजून

प्रिय आईपरी कोण
साऱ्या ब्राह्मडात आहे
यावे-यावे सांगण्यास
‘मन्या’ इथे वाट पाहे!

मनोज बोबडे  

  प्रतीकात्मक छायाचित्र  आत्ता जरा इथून पुढे आत्ता जरा इथून पुढे झोकात चालू!  वरिष्ठांच्याही योग्य त्या धाकात चालू!  धाऊ पडू, पुन्हा उठू, रड...